राज्यमंत्री बच्चू कडू यांनी २०१४ च्या निवडणुकीदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात आपल्या संपत्तीबद्दल खोटी माहिती दिल्याने न्यायालयाने बच्चू कडू यांना दोषी ठरवलं. न्यायालयाने निकाल देताना बच्चू कडू यांना दोन महिन्यांची शिक्षा तसंच २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. पण ज्यांच्यामुळे बच्चू कडू यांना झटका बसला, ती व्यक्ती एकेकाळी त्यांच्या सर्वांत जवळची होती. बच्चू कडू यांची सावली म्हणून ते परिचित होते. राज्यमंत्री बच्चू कडू यांना आव्हान देणारे त्यांचे एकेकाळचे स्वीय सहाय्यक तसंच सध्याचे भाजप नगरसेवक गोपाल तिरमारे यांचा सरकार येताच पोलिस सुरक्षा देउन या लढाईला भक्कम पाठिंबा देण्यात आला आहे.
कोण आहेत गोपाल किरमारे?
राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाच्या स्थापनेपासून त्यांच्या सोबत असलेला एक निष्ठावंत कार्यकर्ता, पुढे जाऊन त्यांचा स्वीय सहाय्यक आणि त्यांच्या विरोधात जाऊन पुढे नगरसेवक बनला. हा प्रवास आहे गोपाल तिरमारे यांचा, ज्यांनी बच्चू कडू यांना ४४० व्होल्टचा झटका दिलाय.
गोपाल तिरमारे म्हणाले, २००७ पासून बच्चू कडू यांच्यासोबत काम करत आहे. बच्चू कडू यांच्या अनेक आंदोलनात मी कार्यकर्ता आणि स्वीय सहाय्यक म्हणून सोबत होतो. त्यांच्या आयुष्यातील अनेक चढ-उतार मी पाहिले आहेत. २०११ मध्ये प्रहार पक्षाच्या तिकिटावर गोपाल तिरमारे चांदूरबाजार नगरपरिषदेच्या प्रभाग २ मधून नगरसेवक म्हणून पहिल्यांदा निवडून आले. याच काळात त्यांनी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सुद्धा जबाबदारी पार पाडली.
या संदर्भात माहिती देताना गोपाल तिरमारे म्हणाले की, बच्चू कडू यांच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढत असताना माझ्यावर अनेकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आणि धमक्या आल्या त्यामुळे आम्ही हे प्रकरण आमच्या वरिष्ठांच्या निदर्शनात आणून दिले व याची माहिती पोलीस प्रशासना दिली त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एक गणवेश व बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ नियुक्ती केली आहे.
तिरमारे यांनी २०१४ च्या निवडणुकीत बच्चू कडू निवडून येण्यासाठी अनेक प्रयत्न केले. २०१५ मध्ये नगरपरिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले होते. यामध्ये प्रहारने मनिषा मनिष नागलिया यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र वेळेवर सुनिता गणवीर सुनिता गणवीर यांना मतदान करण्याचे आदेश प्रहार पक्षाच्या वतीने देण्यात आले. यावेळी गोपाल तिरमारेसह तीन नगरसेवकांनी मनीषा मनीषा नांगलिया यांनाच मतदान केले. यावेळी नांगलिया यांचा विजय झाला आणि त्या चांदूर बाजार नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. पश्चात बंडखोरी केल्यामुळे गोपाल तिरमारे यांच्यासह तीन नगरसेवकांवर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतरच राज्यमंत्री बच्चू कडू आणि स्वीय सहाय्यक ते नगरसेवक असा प्रवास करणाऱ्या गोपाल तिरमारे यांच्यातील मतभेद वाढत गेल्याची माहिती गोपाल तिरमारे यांनी दिली आहे.