म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : बंगालच्या उपसागरामध्ये वायव्येला कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, मराठवाड्यामध्ये शनिवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा येथील घाट परिसरात शनिवार आणि रविवार या दोन दिवशी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरामध्ये वायव्येला कमी दाबाचे तीव्र क्षेत्र निर्माण झाले आहे. या क्षेत्राशी संबंधित चक्रीय वातस्थितीही निर्माण झाली आहे. ही प्रणाली गुरुवारपासून पुढील दोन दिवसांमध्ये ओडिशा आणि छत्तीसगड या दिशेने सरकण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. परिणामी महाराष्ट्रात पावसाला पुन्हा चालना मिळाली आहे. सप्टेंबरचे दोन आठवडे पावसाविना सरल्यानंतर गुरुवारी पुन्हा एकदा मुंबईकरांनी पावसाचा शिडकावा अनुभवला.
दिवसभर ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी मध्यम सरी पडल्या. तर शुक्रवारपासून मुंबईमध्ये ‘यलो अॅलर्ट’; तर रविवारी ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. याशिवाय, रायगड, रत्नागिरीमध्ये शनिवारी आणि रविवारी; तर सिंधुदुर्गात शनिवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ देण्यात आला आहे. जळगाव येथेही शनिवारी ‘ऑरेंज अॅलर्ट’ आहे. उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर शनिवार आणि रविवारी वाढलेला असू शकतो. या काळात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
दरम्यान, बुधवारी उकाड्याने मुंबईकरांची लाही झाल्यानंतर गुरुवारी वातावरणात फरक जाणवला. गुरुवारी दिवसभर मुंबईमध्ये ढगाळ वातावरण होते. तर काही ठिकाणी सकाळी जोरदार सरीही बसरल्या. मध्य मुंबईमध्ये पावसाचा जोर अधिक होता. सायंकाळच्या सुमारास उत्तर मुंबईमध्येही तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढला.