‘ऑस्ट्रेलिया नव्हे! भारत यंदाच्या स्पर्धेत अपराजित आहे हे विसरू नका… भारताने सलग दहा सामने जिंकले आहेत. आतापर्यंत असे किती वेळा झाले आहे की, एखाद्या संघाने अपराजित राहून वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे हे मला तरी आठवत नाही’, असे वेंगसरकर यांनी ‘खलीज टाइम्स’शी संवाद साधताना सांगितले. ‘अर्थात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन पराभवांनंतर यशस्वी पुनरागमन केले हे मीदेखील मान्य करतो. फलंदाजी, गोलंदाजीत त्यांच्याकडे गुणवत्ता आहे; पण… हा ऑस्ट्रेलिया संघ पूर्वीच्या ऑस्ट्रेलियन संघांसारखा ताकदीचा नाही. सध्याच्या ऑस्ट्रेलियन संघात कमकुवत दुवे आहेत. त्यांच्याकडे अॅडम झॅम्पासारखा एकमेव चांगला स्पिनर आहे. तरीदेखील त्यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सरस कामगिरी केली. मात्र त्यांचा वेगवान मारा म्हणावा तेवढा प्रभावी नाही’, असे वेंगसरकर यांना वाटते.
भारताच्या माजी या कर्णधाराने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीबाबतही बारकाईने मुद्दे मांडले. ‘डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लबुशेन, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासारखे आव्हानात्मक फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोटात आहेत. मात्र भारताचे स्पिनर फॉर्मात आहेत. त्यांचा सामना करणे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांसाठी निश्चितच सोपे नसेल’, याकडे वेंगसरकर लक्ष वेधतात.
बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष असलेल्या वेंगसरकर यांनी पॉवरप्लेच्या षटकांचे (दोन्ही डावांतील पहिली दहा षटके) महत्त्व अधोरेखित केले. ही षटके खूप महत्त्वाची ठरतील, असे ते म्हणाले. या षटकांमध्ये भारतासाठी कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तो विक्रम किंवा वैयक्तिक कामगिरीकडे दुर्लक्ष करत प्रतिस्पर्ध्यावर आक्रमण करतो अन् भारताला चांगली सुरुवात मिळवून देण्यासाठी तत्पर असतो. ही बाब हेरून ऑस्ट्रेलिया रोहित शर्मासाठी विशेष डावपेचांसह सज्ज असेलच. आपल्या दिमाखदान ‘स्ट्रोक-प्ले’सह रोहितने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत २९ चेंडूत ४७ धावाची खेळी केली होती. त्याने भारताच्या डावाची मजबूत पायाभरणीच करून दिली होती. ज्यामुळे पुढे ४ बाद ३९७ धावांचा डोलारा उभा राहिला. आज ऑस्ट्रेलियासारख्या संघाविरुद्ध रोहितकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
‘रोहित हा मोठ्या, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये चांगलाच खेळतो. त्याच्या मागील कामगिरीची उदाहरणे बघा. या स्पर्धेतही रोहितने भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. शिवाय गेल्या लढतीत गिलची बॅटही तळपली. ते दोघेही फॉर्मात आहेत. मधल्या फळीत विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव असे तगडे फलंदाज आहेत. तसेही ‘प्लान ए’ अपयशी ठरला तर प्रत्येक संघाकडे ‘प्लान बी’ तयार असतोच. अर्थात सलामीवीरांनी भारताला खणखणीत सुरुवात करू द्यावी अशी आपल्या सगळ्यांचीच इच्छा आहे. मात्र सुरुवातीला विकेट गेल्याच, तरी आपण खांदे पाडायचे नाहीत. कारण ती भरपाई करणारे इतर खंदे वीर आपल्याकडे आहेत हे लक्षात ठेवा’, असा विश्वास वेंगसरकर यांना वाटतो.
गोलंदाजांचाही त्यांनी विशेष उल्लेख केला. ‘आपले स्पिनर फॉर्मात असून मुळातच गुणी आहेत. वेगवान गोलंदाजही फलंदाजीच्या समुहाप्रमाणे एकजूट होऊन लढतात. आता फक्त एवढे लक्षात ठेवायचे की फक्त एकच लढत राहिली आहे. ती नेटाने खेळायची. सकारात्मक आणि आक्रमकतेने. एक धक्का और दो… मोहीम यशस्वीच समजा’, असे वेंगसरकर नमूद करतात.
गोलंदाजांचा विषय निघतो अन् शमीचा उल्लेख होतोच. त्याने सहा सामन्यांत २३ विकेट खिशात घातल्या आहेत. पहिल्या चार सामन्यांत तर त्याचा समावेशही नव्हता. ‘मला शमीचा दृष्टिकोन, वृत्ती खूप आवडली. मी माझ्या अकादमीतील प्रशिक्षणार्थींना कायम सांगत असतो की, जेव्हा केव्हा तुम्हाला संधी मिळेल. ती दोन्ही हातांनी स्वीकारा आणि त्याचे सोने करा. महत्त्वाच्या लढती जिंकून द्या. मोहम्मद शमीने या स्पर्धेत नेमके तेच सिद्ध करून दाखविले आहे. हार्दिक पंड्या जायबंदी झाला आणि शमीला संधी मिळाली. तो प्रभावी ठरला. त्याचा दृष्टिकोन बघा कायम सकारात्मक असतो. त्याला तो आक्रमकतेची जोड देतो. अन् प्रतिस्पर्धी फलंदाजांवर कायम तुटून पडतो. शिवाय तो अनुभवी आहे. गेली कित्येक वर्षी शमी खेळतो आहे अन् मला आशा आहे की तो रविवारच्या फायनलमध्येही आपली भूमिका चोख पार पाडेल’, असे वेंगसरकर यांना वाटते आहे.
भारताला स्टेडियममधील १ लाख ३२ हजार प्रेक्षकांच्या पाठिंब्याचाही फायदा होईल. वेंगसरकर यांच्या मते हे प्रेक्षक म्हणजे टीम इंडियाचा बारावा अन् महत्त्वपूर्ण खेळाडूच ठरतील.
Read Latest Sports News And Marathi News