बँकांत जाऊन मराठी भाषेचा आग्रह धरण्याचे आंदोलन थांबवा:राज ठाकरे यांचे पत्राद्वारे मनसैनिकांना आदेश; पुरेशी जागृती झाल्याचा दावा

गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेसंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यात सुरु असलेले आंदोलन अखेर थांबवणार आहे. या संदर्भात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसैनिकांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रात आपण पुरेशी जागृती केली असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आजच राज ठाकरे यांची मंत्री उदय सामंत यांनी भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी हे पत्र लिहिले आहे. राज ठाकरे यांनी लिहिलेले पत्र देखील वाचा…. माझ्या तमाम महाराष्ट्र सैनिकांना
जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी तुम्ही पुन्हा एकदा जो एक जोरदार आवाज उठवलात त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन. मी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात तुम्हाला आदेश दिला होता की महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसन्या दिवशीपासून तुम्ही महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेलात, तिथे मराठीचा आग्रह धरलात, हे उत्तम झालं, यातून मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही हा संदेश जसा गेला, तसेच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकद पण दिसली. पण आता है आंदोलन थांबवायला हरकत नाही, कारण आपण या विषयांत पुरेशी जागृती केली आहे, आणि हे घडलं नाही तर काय होऊ शकतं याची चुणूक दाखवली आहे. आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच जर कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची? आणि सगळ्यात महत्वाची जबाबदारी सरकारची आहे. रिझर्व्ह बँकेचा नियम त्यांना माहीत आहे आणि त्या नियमाची अंमलबजावणी करून घेणं ही आता सरकारची जबाबदारी आहे. काल कुठेतरी माध्यमांशी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही कोणाला कायदा हातात घेऊ देणार नाही. तशी इच्छा आम्हालाही नाही, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तर मग रिझर्व्ह बँकेच्या नियमाची अंमलबजावणी करणं पण तुमचंच काम नाही का? तुम्ही बँकांना आणि इतर आस्थापनांना मराठीचा सन्मान करायला लावा, मग आम्ही कायदा हातात घेणार नाही हे नक्की. त्यामुळे महाराष्ट्र सैनिकांनो, तूर्तास आंदोलन थांबवा पण या मुद्या वरचे लक्ष हटू देऊ नका. सरकारलाही माझे सांगणे आहे की परत कुठे नियम पाळला जात नसेल, आणि मराठी माणसाला गृहीत धरलं जात असेल, किंवा अपमान केला जात असेल तर पुन्हा तिथे माझे महाराष्ट्र सैनिक त्यांच्याशी चर्चा करायला अवश्य जातील। आपला
राज ठाकरे उदय सामंत याची भेट आणि पत्राचा संबंध आहे का? आज सकाळीच शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भेटीचे नेमके कारण समोर आले नसले तरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसंदर्भात ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या या भेटीनंतर राज ठाकरे यांचे हे पत्र समोर आले आहे. वास्तविक महाराष्ट्रात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फड रंगणार आहे त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यानुसार आज उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकाळीच शिवतीर्थावर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली का? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत दबावातूननिर्णय घेतल्याची चर्चा मराठी न बोलणाऱ्यांच्या विरोधातील आंदोलन राज ठाकरेंनी मागे घेतले असले तरी या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतर्गत दबावातून राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या सर्व घटनांकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.