आमदार वैभव नाईक म्हणाले, महाराष्ट्र सरकारने काढलेल्या शासन निर्णयात कंत्राटी पदे भरण्यासाठी नेमणूक करण्यात आलेल्या ९ कंपन्या भाजपच्या निकटवर्तीयांच्या आहेत. यातील क्रिस्टल इंटग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि. ही कंपनी तर भाजपचे आमदार प्रसाद लाड यांची आहे. या कंपनीने याआधी अनेक विभागात कंत्राटी पदे भरण्याचा ठेका घेतला होता आणि त्यातील कर्मचारी वर्गाचा पगार थकविला होता हा इतिहास आहे.यापूर्वी झालेल्या शासनाच्या कंत्राटी भरतीत एनआरएचएम अंतर्गत आरोग्य सेवक कंत्राटी पद्धतीने भरलेले आहेत. त्यांना पगार कमी दिला जातो. तसेच भविष्यात त्यांना नोकरीची शास्वती दिली जात नाही. १० ते १५ वर्षे काम करून देखील त्यांना नियमित केले जात नाही. विद्युत कर्मचारी देखील कंत्राटी पद्धतीने घेतले आहेत त्यांना देखील पगार वेळेवर दिला जात नाही. त्याचबरोबर त्यांना दुखापत झाली, ऑन ड्युटी असताना अपघात होऊन जीवित हानी झाली तरी त्यांना शासनाची मदत मिळत नाही. त्यामुळे कंत्राटी विद्युत कर्मचाऱ्यांचे जीवन अंधारमय आहे.
कुडाळ येथील महिला हॉस्पिटलमध्ये देखील कर्मचारी कंत्राटी पद्धतीने भरती केले आहेत त्यांना पगार वेळेवर मिळत नाही. याउलट कंत्राटदारानेच कर्मचाऱ्यांना सेवेत घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतले आहेत. त्यामुळे यात मोठा भ्रष्टाचार केला जात आहे. शासनाची कंत्राटी भरती प्रक्रिया पार पडल्यास असाच भ्रष्टाचार होणार आहे. शासकीय रुग्णालयातील ऍम्ब्युलन्सचे ड्रायव्हर देखील कंत्राटी पद्धतीने भरती केले त्यांनाही पगार वेळेवर मिळत नाही.वीज बिल रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील पगार वेळेवर दिला जात नाही आणि कमी पगार देऊन कंत्राटदार त्यांची फसवणूक करतात. त्यामुळे या सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारमय आहे.
त्यामुळे हि कंत्राटी भरती रद्द करून शासनाने लवकरात लवकर शासकीय भरती प्रक्रिया राबवावी. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंधुदुर्गात तीव्र आंदोलन केले जाणार आहे अशी माहिती वैभव नाईक यांनी दिली आहे.