म. टा. खास प्रतिनिधी,मुंबई: लोअर परळ आणि परिसरातील स्थानिकांना वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला लोअर परळ उड्डाणपूल गणेशोत्सवाआधी पूर्णपणे खुला होण्यासाठी मुहूर्तच मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्थानिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. हा पूल खुला करण्यासाठी पाच वेळा मुदतवाढ देण्यात आल्या. आता नोव्हेंबरपर्यंत पुलाचे काम पूर्ण करून तो पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला होणार असल्याचे सांगण्यात आले. वारंवार देण्यात येणाऱ्या मुदतवाढीविरोधात लोअर परळ उड्डाणपूल नागरिक कृती समितीने ‘लोअर परळ उड्डाणपुलाची सहल’ नावाने बुधवारी आंदोलन केले आणि गणेशोत्सावाधी संपूर्ण उड्डाणपूल खुला करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक असल्याच्या कारणास्तव देखभालीसाठी २४ जुलै २०१८ पासून वाहन आणि पादचाऱ्यांसाठी बंद केला. पादचाऱ्यांना पूल नसल्याने करी रोडवरून वरळी नाका व त्यापुढे जाण्यासाठी थेट मार्ग नव्हता. त्यामुळे अनेकजण वरळी नाक्यापर्यंत चालतच जात असत. तर वाहनचालकांना भायखळामार्गे जाऊन पूर्ण वळसा पडत होता. गणपतराव कदम मार्ग, आर्थर रोड जेल मार्ग, वरळी नाका, सेनापती बापट मार्ग याशिवाय करी रोड, लोअर परळ परिसरातील रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. त्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होऊ लागली. त्यानुसार रेल्वे हद्दीतील उड्डाणपूल पूर्ण करण्याची जबाबदारी पश्चिम रेल्वेची आणि उर्वरित पुलाचे काम पूर्णत्वाची जबाबादारी मुंबई महापालिकेवर होती.
पश्चिम रेल्वेने काम पूर्ण केल्यानंतर मुंबई महापालिकेकडून पुलाची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, पूल वेळेत पूर्ण झाला नाही. आता लोअर परळहून करी रोडकडे जाणारा मार्ग १८ सप्टेंबरपासून सुरू करण्याचा प्रयत्न असून करी रोडहून लोअर परळकडे जाणारा मार्ग नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत पूर्ण केला जाणार आहे. याआधीच या पुलावरील काही मार्ग सुरू करून वाहन चालकांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. मात्र, संपूर्ण उड्डाणपुलाचे काम पूर्ण झालेले नाही. गणेशोत्सवाआधी उड्डाणपुलाचे संपूर्ण काम मार्गी लावून तो त्वरीत सुरू करावा, या मागणीसाठी लोअर परळ उड्डाणपूल नागरिक कृती समितीने बुधवारी ‘लोअर परळ उड्डाणपुलाची सहल’ नावाने अनोखे आंदोलन केले. यामध्ये शाळकरी विद्यार्थ्यांनाही सहभागी करण्यात आले.
‘लोअर परळ उड्डाणपूल सुरू करण्यासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. याआधी पाच वेळा मुदतवाढ दिली असून त्यामुळे स्थानिकांची गैरसोय होत आहे’, असे या समितीचे सदस्य मारूती दळवी आणि गौरव संकपाळ यांनी सांगितले. गणेशोत्सवाआधी संपूर्ण पुलाचे कामही पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलने केल्याचे संकपाळ म्हणाले.