पुढील 100 दिवसांच्या आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक:AI वापर करून रस्ते सुरक्षावर भर द्यावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ विस्तर तसेच खातेवाटप झाल्यानंतर फडणवीस मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेत आहेत. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांनी परिवहन विभागाचा आढावा घेतला आहे. या बैठकीत विभागाची माहिती घेत तसेच आढावा घेऊन काही निर्देश दिले असून 100 दिवसांच्या आरखाड्याच्या अनुषंगाने बैठक घेतली. परिवहन विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्देश दिले आहेत. राज्यातील परिवहन क्षेत्राला राज्याला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.पॉलिसी घोषित करण्याबरोबरच 15 वर्ष झालेली वाहने भंगारात काढावीत. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा वापर करून रस्ते सुरक्षा वाढवण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा. त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढावे, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. राज्यात परिवहन सेवेला अधिक गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. तसेच वडसा-गडचिरोली, सोलापूर-धाराशिव येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्याची देखील त्यांनी सूचना दिली आहे. राज्य परिवहन सेवेच्या 15 वर्षे झालेल्या बसेस भंगारात टाकून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. बसविण्यात यावी जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील 100 दिवस आराखाड्याच्या अनुषंगाने आढावा बैठक घेतली. या बैठकीत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. तसेच इतर मंत्रिमंडळ व अधिकारी उपस्थित होते.