महाराष्ट्रातील शिवकालीन युद्धकला जगभर प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच युद्ध कलेवर आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केलं. याच युद्ध कलेच्या जोरावर शत्रूंना गुडघे टेकायला भाग पाडलं. मुलगा चालायला लागला की युद्धकलेच शिक्षण देण्यास सुरुवात होत असतं. पुरुषांप्रमाणेच महिलांही युद्धकला कौशल्ये आत्मसात करत असतं. रणांगण गाजवणारे अनेक शूरवीर याच मातृभूमीत होऊन गेले. त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ मासाहेब, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा यासारख्या कर्तबगार महिलांनी रणांगण गाजवून स्वराज्याचे रक्षण केले. कालांतराने ही युद्ध कला मर्दानी खेळांच्या रूपात पुढे आली आणि याच थोर रणरागिनींचा वारसा कोल्हापूरकर आजही जपत आहेत.
कोल्हापुरात मर्दानी खेळांसाठी अनेक आखाडे आणि तालीम प्रसिद्ध आहेत. याच आखाड्यांच्या माध्यमातून पुरुषांबरोबरच महिलांही मर्दानी खेळांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी असतात. शिवाय गणेशोत्सव हा अवघा काही दिवसांवर आला आहे. याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मर्दानी खेळांना आता मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूर सह इतर राज्यातही मोठी मागणी होत आहे. दरम्यान शिवकालीन ढोल ताशा वाद्यांसह मर्दानी खेळांच्या या परंपरेला ही अनन्य साधारण महत्त्व असल्याने ही परंपरा कशी टिकवली जाईल आणि भावी पिढीच्या रक्तात कशी उतरली जाईल, यासाठी हे आखाडे विशेष प्रयत्न करतात. तसेच या मर्दानी खेळांमध्ये अनेक प्रकारचे खेळ आहेत…युद्ध कलेच्या नीती आहेत…
दरम्यान पुरुषांबरोबर तरुणी ही या मर्दानी खेळात अग्रेसर सहभाग नोंदवतात. अगदी नऊवारी साडी नेसून आणि कपाळावर चंद्रकोर लावून तरुणी या खेळांमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. विशेष म्हणजे हातात काठी, ढाल, तलवार असे एखादे शस्त्र घेतले की जणू काही त्यांच्या अंगातील रक्तच या ठिकाणी सळसळत असते. या युद्ध कलेचा वापर महिला, युवती या आत्मसंरक्षणासाठी ही करताना दिसून येते. या मर्दानी खेळात अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीपासून साठ वर्षाच्या व्यक्तीही यामध्ये हिरीरीने आपला सहभाग नोंदवतात.
सध्याच्या युगात अनेक जण आपल्या मुलींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी कराटे बॉक्सिंग सारख्या खेळांमध्ये घालतात. मात्र समाजातील प्रत्येक युवतीने या युद्ध कला आणि मर्दानी खेळ शिकणे काळाची गरज आहे. अवघ्या सहा वर्षाच्या असणाऱ्या एका चिमुकलीला तिच्या कुटुंबियांनी उल्हासपणे या आखाड्यात पाठवलं आणि वर्षभरात या चिमुकलीने अगदी अलगदपणे या युद्ध कलेतील काही नीती शिकल्या तसं समाजातील प्रत्येक पालकाने आपल्या मुलींना मर्दानी खेळ शिकवले पाहिजे, असे पालकांचे म्हणणे आहे. शिवकालीन ढोल ताशा सोबतच ही शिवकालीन युद्धनिती, मर्दानी खेळ, आपल्या पूर्वजांनी दिलेला एक अनमोल ठेवा आहे. सध्याच्या डीजे आणि गाण्यावर थिरकणाऱ्या या तरुणाईला हा इतिहास समजणे आणि याचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण ही शिवकालीन कला दाखवण्यासाठी आखाड्यांना मागणी करत आहेत.