एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे:अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणारही नाही, प्रकाश आंबेडकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वांसमोर मांडले. राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकलीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देत टीका केली आहे. तसेच यावेळी पत्रकारांशी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या युतीच्या चर्चेवरही प्रतिक्रिया दिली आहे. पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कोणाचा परफॉर्मन्स चांगला झालाय हे मुख्यमंत्री यांनी सांगावे, काय नेमके बदल केले आहेत याच्या पलीकडे काय आहे, नवीन बदल काय आणि त्याने काय बदल घडवले आहेत? महिला बालविकासचे जर काही क्रेडिट असेल तर ते एकनाथ शिंदे यांना जाईल. कारण त्यांनी 1500 दिले त्यामुळे कंज्यूम पॉवर वाढली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे, नाहीतर अजगर कधी गिळणार हे त्यांना कळणार नाही, असे म्हणत फडणवीसांवर टीका केली आहे. पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, कामगारांच्या अधिकारांबाबत त्यांनी जागृत राहिले पाहिजे, हे अधिकार कमी होणार नाहीत याबाबत खबरदारी घेतली पाहिजे. कामगारांना योग्य मोबदला मिळणे गरजेचे आहे. अलीकडे कामगार चळवळी लुप्त झाल्या आहेत. आता कामगार चळवळ नव्याने उभी राहील, किंवा स्वतः कोणीतरी उभे राहील असे वाटत नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात युती होणार, अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील असे मला वाटते. ही अस्तित्वाची लाढई आहे. तसेच पवार कुटुंब देखील एकत्र येणार असे बोलले जात आहे. यावर आंबेडकर म्हणाले, दोन्ही पवार वेगळे नव्हते तेव्हाच सांगितले होते.