हिंगोलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही:कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त अभिनव गोयल सत्काराने भारावले

हिंगोलीकरांचे प्रेम विसरू शकणार नाही:कल्याण डोंबिवली मनपाचे आयुक्त अभिनव गोयल सत्काराने भारावले

हिंगोली जिल्ह्यात काम करताना चांगले अनुभव आले हिंगोलीकरांनी दिलेले प्रेम कदापिही विसरू शकणार नाही, अशी भावना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त अभिनव गोयल यांनी सोमवारी ता. 28 येथे व्यक्त केली. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांचा त्यांचा बदली झाल्या नंतर सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी अनिल माचेवाड, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी प्रतीक्षा भुते, विकास माने, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, तहसीलदार शारदा दळवी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना तत्कालीन जिल्हाधिकारी अभिनव गोयल म्हणाले की, हिंगोली सारख्या जिल्ह्यामध्ये अगदी सात महिन्याच्या कालावधी उत्कृष्ट काम करता आले. लोकप्रतिनिधी, अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे विविध उपक्रम राबविण्यात यशस्वी झालो. हिंगोली जिल्ह्यातील शाळांमधील गुणवत्ता वाढीसाठी राबविलेल्या निपुण हिंगोली उपक्रमाला शिक्षण विभागाने मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे शिक्षणाचा दर्जा वाढविता आला आहे. यासोबतच शासनाच्या विविध योजनांची गावपातळीवर परिणामकारक अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला. गरजू लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देताना त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहून समाधान वाटत होते. महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर राबविलेले संजीवनी अभियान हे महत्त्वपूर्ण अभियान ठरले आहे. यामुळे महिलांच्या आजाराची तातडीने माहिती मिळून त्यांच्यावर उपचार होणे शक्य होत आहे. हिंगोली जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल सह पुणे विभागाच्या प्रयत्नाला मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. शासकीय वैद्यकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन व जिल्हा व सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन माझ्या कालावधीत याचा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. हिंगोलीकरांनी दिलेले प्रेम कधीही विसरू शकणार नाही. भविष्यात सेवानिवृत्तीनंतर एखादे पुस्तक लिहिल्यास त्यामध्ये हिंगोली साठी स्वतंत्र पानच लिहावे लागेल असे सांगत त्यांनी हिंगोलीकरांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त केले. नागरिकांनी यापुढेही प्रशासनाला सहकार्य करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment