कोल्हापुरातील राधानगरी तालुक्यातील वन कर्मचारी म्हणून काम करणारे भास्कर कांबळे आणि भाजीपाला विक्रेता असलेला युवराज कांबळे दोघात मैत्रीचे संबंध होते. ते दोघेही आपापल्या कुटुंबासह वारे वसाहत परिसरात राहत होते. दोघांची मैत्री घट्ट असल्याने परिवारात देखील मैत्री झाली होती. त्यामुळे दोघांचेही एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून युवराजचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय वन कर्मचारी भास्कर कांबळे यांना येत होता.
याचा राग त्यांच्या डोक्यात होता. याच विषयावरून दोघांत सतत वाद होत होते. हा वाद मिटवण्यासाठी बुधवारी सायंकाळी दोघे संभाजी नगर येथील एका मित्राच्या घरात एकत्र आले होते. वाद मिटलाही होता, मात्र वाद मिटवून परत जाताना वारे वसाहत येथील महादेव मंदिराजवळ त्यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला. हा वाद हाणामारीवर गेला. दोघात झटापट सुरू झाली.
याच वेळी भास्कर कांबळे खाली पडलेले. त्यांच्या डोक्यात दगड घालून युवराजने त्यांचा खून केला. त्यानंतर युवराजने स्वतः पोलिस ठाण्यात हजर होत घटनेची माहिती दिली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.