भारतीय लष्कराचे कौतुक शब्दात करता येणार नाही:भारत स्वतःहून छेड काढत नाही, पण कोणी काढली तर सोडत नाही – ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे

पहलगाम हल्ल्याचे प्रत्युत्तर भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’मधून चोख दिले आहे. पाकिस्तान तसेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हवाई दलाने हवाई हल्ला करत दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत स्वतःहून कोणाची छेड काढत नाही, मात्र कोणी केले तर सोडायचे नाही. ही कारवाई योग्य आहे, असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे म्हणाले, भारतीय लष्कराने केलेल्या कामाचे कौतुक शब्दांत करता येणार नाही. इतके सुंदर काम लष्कराने केले आहे. भारत स्वतःहून कोणाची छेड काढणार नाही. मात्र दुसऱ्याने छेड काढली तर सोडायचे नाही. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरची ही कारवाई योग्यच आहे. काही कारण नसताना आपले 26 लोक मारले गेले. त्याचाच सूड भारताने घेतला आहे. त्यामुळे कोणी काही बोलू शकत नाही. अशा प्रकारे कारवाई केल्याने आता कुणाचीही हिंमत होणार नाही. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नसते – राज ठाकरे आपल्या भारतात पहलगाम इथे जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा मी पहिले ट्विट केले होते की ज्यांनी हल्ला केला आहे अतिरेकी, दहशतवादी जे कोणी असतील त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे, अत्यंत कठोर असा की त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचे उत्तर हे युद्ध नसते, असे विधान मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ वर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, युद्ध हे काही उत्तर नाही. आता अमेरिकेत ट्विन टॉवर पाडले, पेंटागॉनवर हल्ला झाला म्हणून त्यांनी जाऊन युद्ध नाही केले. त्यांनी ते अतिरेकी ठार मारले. हे युद्ध परिस्थिती आणायची आणि आता मॉक ड्रिल करायचे आणि ते सायरन वाजवणार वगैरे वगैरे. मुळात ही गोष्ट का घडली हे पण आपण लक्षात घेण्यासारखे आहे. मला असे वाटते की थोडे अंतर्मुख होऊन होणे गरजेचे आहे. हेही वाचा