‘लाडकी बहीण’मुळे 2027 पर्यंत कोणतेही काम होणार नाही:काँग्रेस नेत्याचा दावा, पिक विमा योजनेवरूनही सरकारवर हल्लाबोल

महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच राज्यात झालेल्या पिक विमा घोटाळ्यावरून काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे. पिक विमा बोगस योजना बोगस असून हे फार मोठे रॅकेट आहे, अशी टीका कैलास गोरंट्याल यांनी केली आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमुळे 2027 पर्यंत कोणतेही काम येणार नाही, आणि होणारही नाही, असा दावाही गोरंट्याल यांनी केला. महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली होती. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना महिन्याला दीड हजार रुपयांचे मानधन दिले जाते. मात्र या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा आहे. तसेच सरकार इतर योजनांचा पैसा हा लाडकी बहीण योजनेकडे वळवत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कैलास गोरंट्याल यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नेमके काय म्हणाले कैलास गोरंट्याल? पिक विमा योजनेबाबत कैलास गोरंट्याल म्हणाले की, पिक विमा बोगस आहे. पिक विमा योजनेमध्ये गैरप्रकार झाल्याचे मी अधिवेशनामध्ये सुद्धा बोललो होतो. ज्या माणसाला शेती नाही त्याला पैसे भेटतात आणि ज्याला खरी शेती आहे त्याला काहीच भेटत नाही. पिक विमा हे फार मोठे रॅकेट आहे. एक रुपयात पिक विमा ही तर फसवी योजना होती. या योजना सरकारच्या अंगलट येतील लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना कैलास गोरंट्याल यांनी मोठा दावा केला आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तर 2027 पर्यंत कोणतेही काम येणार नाही आणि होणारही नाही, असे गोरंट्याल म्हणालेत. मी पोलिस खात्यातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोललो, तर मला अशी शंका यायला लागली, आमचे पगार पण येतात की नाही. एसटी महामंडळाच्या लोकांचे अर्धे पगार भेटलेच नाही अशी अवस्था सध्या आहे, असेही गोरंट्याल म्हणाले. त्यामुळे या सर्व फसव्या योजना आहेत आणि यामुळे सर्व काही त्यांच्या अंगावर येणार आहे. त्यामुळे याला जबाबदार त्यावेळचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेच आहेत असा आरोप कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. सरकारला लॉलिपॉप दाखवून सत्तेवर आले खोटे बोलून, लाडकी बहीण योजनेचे लॉलिपॉप दाखवून ते सत्तेवर आले, 2100 रुपये बोलले होते, परंतु पंधराशे रुपये सध्या नीट देत नाहीत. योजनेतील लाभार्थ्यांची काट छाट सुरू झालेली आहे. 2 कोटी 30 लाख महिलांनी याचा फायदा घेतला, त्यामुळे तेवढे मतदान यांना फुकट भेटले, असा टोला कैलास गोरंट्याल यांनी सरकारला लगावला आहे.