महाराष्ट्र अजून पूर्ण झालेला नाही:बेळगाव, कारवार जोडला जाईल; तेव्हाच खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पूर्ण होईल – अजित पवार

बेळगाव आणि कारवारसह इतर सीमावर्ती भाग महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याशिवाय आपला महाराष्ट्र पूर्ण होणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अजित पवार यांनी संपूर्ण महाराष्ट्राची ओळख सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव 2025 या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. हा महोत्सव दरवर्षी 1 मे रोजी साजरा केला जाणार असल्याची घोषणा यावेळी अजित पवारांनी केली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर उभा राहिलेला महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा आजही तसाच प्रलंबित हा मुद्दा राजकीयदृष्ट्या संवेदनशील बनला आहे. 1986 साली कोल्हापुरात सीमापरिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला माधवराव गायकवाड, एस. एम. जोशी, शरद पवार , गोविंद पानसरे यांसारख्या दिग्गजांनी सहभाग दर्शवला होता. त्याच दरम्यान विरोधी पक्षनेते असलेले शरद पवार गनिमी काव्याने बेळगावात पोहोचून सत्याग्रह करण्याच्या उद्देशाने दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक करून परत कोल्हापुरात आणले. तेव्हापासून आजतागायत हा सीमावाद तसाच रेंगाळलेला आहे. त्यामुळेच महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र अद्यापही पूर्ण नसल्याची खंत बोलून दाखवली. अजित पवार पुढे म्हणाले की, सध्या एआयचे युग आहे, आज पत्रकार भावे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. आजपर्यंत जे मुख्यमंत्री झाले त्यांनी राज्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण 35 कोटी होतो. आता, 135 कोटी झालो आहोत. आम्ही टँकरमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. शेतीला मदत व्हावी म्हणून एआयसाठी 500 कोटी रुपये तरतूद केली आहे. त्यामुळे पाणी बचत व खतांची देखील बचत होईल. बुलेट ट्रेनबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, बुलेट ट्रेनची आपल्याला गरज आहे, कारण जपान-चायना बुलेट ट्रेनमुळेच पुढे गेले आहेत. कोकण रेल्वेची नवीन लाईन टाकणार आहोत, यासंदर्भात आम्ही आज पंतप्रधानांसोबत बोलत होतो. दरम्यान, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांची विचारधारा घेऊन आम्ही काल चालत होतो. आजही चालत आहोत आणि उद्या देखील चालत राहणार आहोत, असेही अजित पवार म्हणाले. हे ही वाचा… महाराष्ट्र दिन विशेष:महाराष्ट्रासाठी 105 जणांचे हौतात्म्य, कॉम्रेड डांगेंनी केले लढ्याचे नेतृत्व; शाहिरांचे शौर्य, अत्रेंच्या तोफेची रोमहर्षक गाथा! संयुक्त महाराष्ट्राचा लढा मुंबईच्या रस्त्यावर लढला गेला. त्यात 105 हुतात्मे झाले. यापैकी तब्बल 85 जण मुंबईतले गिरणी कामगार होते. या कामगारांचे नेतृत्व कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांनी केले. त्यांच्या तडाख्यामुळेच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. श्रीपाद डांगे यांचे संघटना बांधणीचे असामान्य कौशल्य, घणाघाती भाषणे या दुग्धशर्करा योगाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा यशस्वी झाला. त्यामुळे कॉम्रेड डांगे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात. या लढ्यात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना साथ दिली एस. एम. जोशी, आचार्य अत्रे, चिंतामणराव देशमुख, सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बॅ. नाथ पै यांनी. सविस्तर वाचा…