मुंबई : राज्यात दडी मारलेला मान्सून आता पुन्हा सक्रीय झाला असून यामुळे पुढचे काही दिवस पावसाचे असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. अशात हवामान खात्याने १६ सप्टेंबरला मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी केला आहे. यावेळी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये तुफान पाऊस होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मध्य महाराष्ट्रामध्ये हवामान खात्याकडून रेड अलर्ट तर इतर जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडावं आणि सुरक्षित स्थळी राहावं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा राज्यामध्ये एल निनोचा प्रभाव असल्यामुळे अद्यापही महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी आहे.
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अनेक जिल्ह्यांना आजही मुसळधार पावसाची आणि चांगल्या पावसाची अपेक्षा आहे. अशात पुढील ४-५ दिवस राज्यात पावसाचा जोर पाहायला मिळेल. मान्सून प्रणाली पश्चिमेकडे सरकल्यामुळे राज्यात पावसाचे वारे वाहतील. त्यामुळे उद्यापासून राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणच्या काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण वाढणार असल्याची माहिती आहे. मुंबई आयएमडीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोल्हापूर या २ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो आहे. तर उत्तर महाराष्ट्रादेखील जोरदार पावसाची शक्यता आहे.