गेली १६ दिवस उपोषण, चर्चेच्या फेऱ्या, मंत्री-आमदार- शिष्टमंडळाची भेट अशी सगळी धावपळ आंतरवाली सराटीत सुरू होती. सुरूवातीच्या काही दिवसांत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. लाठीचार्जच्या घटनेनंतर जरांगे पाटलांना संपूर्ण राज्यातल्या मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला. त्यानंतर आंदोलनाला देखील धार चढली. शासनाच्या पातळीवरही आंदोलनाची गंभीर दखल घेण्यात आली. शासनाचे प्रतिनिधी आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न करत राहिले. पण आरक्षण द्या-मी आंदोलन मागे घेतो, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील मांडत राहिले. उपोषणाची कोंडी फुटत नव्हती. अखेर जरांगे यांच्या शिष्टमंडळाची शासनासोबत बैठक झाल्यावर शासनाला एक महिन्यांचा अवधी देण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यानी घेतला. जरांगे पाटलांनी उपोषण सोडण्याच्या आधी शासनाला ५ अटी पाळण्याच्या शर्थीवर उपोषण मागे घेतो, असं सांगितलं. शासनाने या अटी मान्य केल्यानंतर आज अखेर जरांगे पाटलांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सरबत घेऊन उपोषण सोडलं.
पण हा सगळा लढा मनोज जरांगे यांच्या कुटुंबीयांसाठी वाटतो तेवढा सोपा नव्हता. मनोज जरांगे १७ दिवसांपासून घराबाहेर होते. समाजासाठी अन्न पाणी सोडून ते उपोषणाला बसले होते. घरी मुलगा, मुलगी, पत्नी तसेच आईवडील त्यांची चातकासारखी वाट पाहत होते. “आलो तर तुमचा नाहीतर समाजाचा” अशी भावनिक घोषणा करुन त्यांनी सर्वांच्याच काळजाला हात घातला होता. अखेर उपोषण सुटल्यानंतर जरांगे यांच्या कुटुंबियांनी आंदोलनावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
उपोषण सुटलं याचा तिघांनाही आनंद असला तरी सरकारने आपला शब्द पाळावा आणि बोलल्याप्रमाणे वेळेत आरक्षण द्यावं, अशी अपेक्षा जरांगे पाटील यांच्या पत्नी,मुलगा आणि मुलीनेही व्यक्त केलीये. समाजासाठी १७ दिवस उपोषण करणाऱ्या वडिलांचा अभिमान वाटतो, अशी भावना त्यांची मुलगी पल्लवीने व्यक्त केली तर ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्याच दिवशी या लढ्याला यश मिळेल, असं मुलगा शिवराज म्हणतो.