मी 50 वर्ष कॉंग्रेसमध्ये होतो:कोण कोणाला गिळत आहे कळेल, अशोक चव्हाणांचा हर्षवर्धन सपकाळांवर पलटवार

मी 50 वर्ष कॉंग्रेसमध्ये होतो:कोण कोणाला गिळत आहे कळेल, अशोक चव्हाणांचा हर्षवर्धन सपकाळांवर पलटवार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे कॉंग्रेस पक्षातील महत्त्वाचे नेते होते. त्यांनी जवळपास अर्धशतक कॉंग्रेसमध्ये घालवले आहे. आता ते भाजपमध्ये आहेत. 50 वर्ष कॉंग्रेसमध्ये घालवल्यानंतर आता अशोक चव्हाण कॉंग्रेसवर टीका करताना पाहायला मिळतात. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानावर अशोक चव्हाण यांनी पलटवार केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अशोक चव्हाण यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना टीका केली आहे. हर्षवर्धन सपकाळ अजून नवीन आहेत. त्यांना बराच अनुभव घ्यायचा आहे. मी पन्नास वर्ष कॉंग्रेसमध्ये काम केले. कोण कोणाला गिळत आहे याचा अनुभव मी घेतलेला आहे. नवीन अध्यक्ष असल्याने त्यांना गिळल्यावर लक्षात येईल की कोण कोणाला गिळत आहे. पुढे बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, एखादा पक्ष प्रादेशिक असो किंवा राष्ट्रीय, ज्या पक्षाशी जनतेचा संपर्क असतो तो पक्ष कधीही संपू शकत नाही. दक्षिणेत आजही प्रादेशिक पक्षाचे मोठे अस्तित्व आहे. मीही पन्नास वर्षे कॉंग्रेसमध्ये होतो. त्यामुळे त्या पक्षात अधोगतीविषयी बोलणे मला योग्य वाटत नाही. मी माझी दिशा स्वीकारली आहे. मी आहे त्या ठिकाणी समाधानी आहे, असेही ते म्हणाले. हर्षवर्धन सपकाळ काय म्हणाले होते? भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कॉंग्रेसला फोडा आणि रिकामी करा, असे विधान केले होते. पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांच्या विधानावर हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली होती. ते म्हणाले, भाजप ही कॉंग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे. आता या चेटकिणीचे पोट नेते खाऊन भरलेले नाही. आता ही चेटकीण कॉंग्रेसचे कार्यकर्ते खायला निघाली आहे, असे मी म्हणालो होतो. आता चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानातून ते सिद्ध होत आहे, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले होते. कॉंग्रेसला फोडा, कॉंग्रेसला रिकामी करा चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. संग्राम थोपटे यांनी सगळे काँग्रेसला दिले तरी सुद्धा त्यांना पक्ष सोडावा लागला. त्यांना त्यांच्या पक्षाकडून, राहुल गांधी यांच्याकडून अपेक्षा नाहीत. कुठले ही धोरण काँग्रेसला नाही. जो जो काँग्रेस किंवा इतर पार्टी मधून आमच्याकडे येईल त्याचे स्वागत आहे. काँग्रेसला फोडा, काँग्रेसला रिकामी करा. तुम्ही थकून जाल इतके जण आमच्याकडे येत आहेत. काँग्रेसची लोक आपल्याकडे आली तरी तुमचा आधी विचार करणार, असे आश्वासन बावनकुळे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिले. हेही वाचा

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment