जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील सावदा येथे एका नेत्र रुग्णालयाच्या शुभारंभ प्रसंगी गुजरातचे प्रदेश अध्यक्ष सी. आर. पाटील आले होते. त्यांच्या हस्ते नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. एकाच व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील व एकनाथ खडसे दिसून आल्याने हा जळगाव जिल्ह्यासाठी राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.
जातीच्या पातीच्या राजकारणामुळे महाराष्ट्र राज्य विकासात मागे पडले, सी.आर पाटलांचा घरचा आहेर
आपण गुजरातचे नसलो तरी गुजरातमध्ये आपल्याला भरभरून मतदान मिळत असते. कारण आपण कोणतेही जातीचे राजकारण करत नाही याचा विश्वास त्या ठिकाणच्या जनतेला असल्याने ते माझ्या पाठिशी उभे राहतात. पण सध्या महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण सुरु असल्यामुळे राज्याची प्रगती खुंटत आहे. कधी काळी विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र सगळ्यात पुढे असलेले राज्य आता मागे पडू लागले आहे. महाराष्ट्र राज्य पुढे न्यायचे असेल जाती पातीच्या विचाराला नव्हे तर गुणवत्तेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, नाहीतर या जातीपातीच्या विचारांचा फटका आपल्या पुढच्या पिढ्यांना बसणार असल्याचा इशाराही त्यांनी महाराष्ट्रातीच्या राज्यकर्त्यांना दिला आहे.
नरेंद्र मोदींनी विकास पुरुष म्हणून आपली ओळख निर्माण केली- सी.आर.पाटील
यावेळी गुजराचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांनी मनोगतात काँग्रेसवर टीका करतांना दुसरीकडे नरेंद्र मोदी यांना विकासपुरूष संबोधत त्यांचे कौतुक केले. पंडीत जवाहरलाल नेहरु यांची केवळ श्रीमंत व्यक्ती म्हणून जनमानसात ओळख होती. त्यांच्या खिशाला नेहमी गुलाबाचे फूल असायचे. पण देशासाठी त्यांचं कोणतंही काम केलं नसल्याचे सी आर पाटील म्हणाले. नेहरुंच्या कन्या इंदिरा गांधी या सुध्दा पाकिस्तानविरुध्दचे युध्द जिंकले म्हणून नावारुपाला आल्या. इंदिरा गांधींनीही गरीबी हटावचा नारा दिला पण प्रत्यक्षात गरीबी कमी झालीच नाही. दुसरीकडे नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी गुजरातचा विकास करून दाखवला आणि विकास पुरुष म्हणून आपली ओळख निर्माण केली. कोणताही राजकीय वारसा नसताना, एका गरीब घरातून आलेल्या मोदींनी आपल्या काम करण्याच्या शैलीने थेट पंतप्रधानपदापर्यंत मजल मारली.
एकनाथ खडसे म्हणाले, मी सी. आर. पाटील यांच्या वक्तव्याशी सहमत!
मनोगतात सी. आर. पाटील यांनी महाराष्ट्रात जातीयवाद वाढत असल्याने आणि राजकारणाचा दर्जा खालावत असल्याने महाराष्ट्र मागे पडत असल्याचं सी आर पाटील यांनी म्हटलं. त्यांच्या वक्तव्याशी आपण सहमत असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.