पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना शहीद घोषित करावे:त्यांच्या कुटुंबियांना भारत सरकारने भरपाई द्यावी, प्रकाश आंबेडकरांची केंद्र सरकारकडे मागणी

ऑपरेशन सिंदूर नंतरच्या दिवशी, म्हणजे बुधवार-गुरुवारी रात्री, पाकिस्तानने 15 हून अधिक भारतीय लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. रशियाकडून मिळालेल्या S400 संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून भारताने हा हल्ला हाणून पाडला. गुरुवारी सकाळी भारताने पाकिस्तानची हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली. यासाठी इस्रायलकडून मिळालेल्या हार्पी ड्रोनचा वापर करण्यात आला. परंतु पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात पुंछ येथे अनेक नागरिकांचा मृत्यू झाला तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत. यावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सरकारकडे मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांनी याबाबत ट्विट केले आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना शहीद घोषित करावे आणि त्यांच्या कुटुंबियांना भारत सरकारने भरपाई द्यावी अशी वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे. पाकिस्तान सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवत आहे की त्यांनी राफेल विमान पाडले आहे. भारतीय सशस्त्र दलांचे मनोबल वाढवण्यासाठी पाकिस्तानने केलेले हे खोटे दावे भारताने जोरदारपणे नाकारले पाहिजेत. आंतरराष्ट्रीय आर्थिक समुदायात पाकिस्तानला वेगळे पाडण्यासाठी भारताने आपले सर्व राजनैतिक प्रयत्न वापरावेत. पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देत आहे आणि त्याला प्रादेशिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगळे केले पाहिजे. आपला दृष्टिकोन परिस्थिती आणखी चिघळवण्याचा नसावा परंतु जर पाकिस्तानी सैन्याने आपल्या देशावर हल्ला केला तर भारताने अत्यंत कठोर प्रत्युत्तर देण्यासाठी तयार असले पाहिजे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. दरम्यान, संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी दुपारी 2.30 वाजता सांगितले की, पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील शहरांनाही लक्ष्य केले. या काळात अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज येथे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली. हे देखील उधळून लावण्यात आले.