शहिद मुरली नाईक यांचे मुंबईत स्मारक बांधणार:कुटुंबाला भेटण्यासाठी शिवसेनेचे मंत्री आंध्र प्रदेशमध्ये; एकनाथ शिंदे यांचाही व्हिडिओ कॉलवर संवाद

पाकिस्तान सोबत लढताना शहीद झालेले जवान मुरली नाईक यांचे कुटुंब सध्या आंध्र प्रदेश येथील त्यांच्या मूळ गावी आहे. या ठिकाणी जात मंत्री उदय सामंत यांनी कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. आपल्या मुलाचे स्मारक मुंबईमध्ये ज्या ठिकाणी त्याचा जन्म झाला, त्या ठिकाणी व्हावे, अशी इच्छा यावेळी मुरली नाईक यांच्या वडिलांनी व्यक्त केली. यावर एकनाथ शिंदे यांनी तात्काळ निर्णय घेत लवकरच आपण शहीद जवान मुरली नाईक यांचे स्मारक उभे करणार असल्याचे त्यांना सांगितले. पाकिस्तानकडून सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात शहीद झालेल्या मुरली नाईक यांच्या कुटुंबाची महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी आंध्र प्रदेश येथे जाऊन भेट घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्यासोबत व्हिडिओ कॉलवर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत म्हणाले की, “आपल्या देशात निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे मुंबईत राहणाऱ्या आपल्या महाराष्ट्रातील एका सैनिकाला आपला जीव गमवावा लागला हे दुर्दैवी आहे. तसेच त्यांच्या कुटुंबाच्या इच्छेनुसार मुंबईत शहीद जवान मुरली नाईक यांचा पुतळा आपण लवकरच उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. उरी मध्ये लढताना आले वीरमरण
मुंबई येथील मुरली नाईक हे दिनांक 9 मे रोजी पहाटे एलओसी (LOC) येथे पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धात शहीद झाले आहेत. त्यांचे वय केवळ 23 वर्ष होते. मुरली नाईक यांचे वडिल घाटकोपर भागात मजुरीचे काम करतात. पंतनगर पोलिस ठाणे, मुंबई हद्दीतील सध्या चित्रा डेअरी जवळ, कामराज नगर, घाटकोपर पूर्व, मुंबई या ठिकाणी राहणारे ते 2022 मध्ये भारतीय सेना दलामध्ये नोकरीस लागले होते. त्यांची ट्रेनिंग देवळाली, नाशिक येथे झाली होती, ते पहिल्यांदा आसाम येथे पोस्टिंगला होते. त्यानंतर ते पंजाब येथे तैनातीस असताना युद्धा दरम्यान जम्मू काश्मीरमध्ये उरी या ठिकाणी कर्तव्य देण्यात आले होते, त्या दरम्यान युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तान सोबत लढताना जवान मुरली नाईक शहीद झाले आहेत. झोपडपट्टी पुनर्विकासात त्यांचे घर गेले दरम्यान, मूळचे आंध्र प्रदेशचे रहिवासी असलेले नाईक कुटुंब हे कामराज नगरच्या झोपडपट्टीमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी सदरची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्याने त्यांची घरे तोडण्यात आली आहेत. त्यामुळे, सध्या नाईक यांचे कुटुंब आंध्र प्रदेशाला राहण्यास गेले आहे. मुंबईतील घाटकोपर वार्ड क्रमांक 133 मध्ये मुरली नाईक यांच्या शहीद झाल्याचे बॅनर लावण्यात आले असून त्यांना स्थानिकांकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.