राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार व पक्षातून बाहेर पडून भाजप- एकनाथ शिंदे गटाच्या सरकारमध्ये सहभागी झालेले अजित पवार यांचा गट यांच्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि चिन्हाचा वाद निवडणुक आयोगात सुरू आहे. दोन्ही गटांकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला गेला आहे. सोमवारच्या सुनावणीत शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करताना अजित पवार गटाने हजारो खोटी प्रतिज्ञापत्रे सादर केल्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली. या सुनावणीला स्वतः शरद पवार यांच्यासह त्यांच्या गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. अजित पवार गटाकडून रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार उपस्थित होते.
सिंघवी म्हणाले की, २६ ॲाक्टोबर रोजी अजित पवार गटाने एका पदाधिकाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र दिले आहे; पण ते बनावट असल्याचे आम्ही आयोगाच्या नजरेस पुराव्यासह आणून दिले आहे. त्यांच्या बनावट कागदपत्रांची २४ गटांत वर्गवारी केली आहे. त्यांनी उल्लेख केलेल्या त्यांच्या कथित कार्यकर्त्यांपैकी काही जण त्या शहरातच राहत नाहीत. काही विमा एजंट आहेत. काही मृतांच्या नावेही प्रतिज्ञापत्रे दाखल केली आहेत. अजित पवार गटाने हे अतिशय लाजिरवाणे काम केले आहे. त्यामुळे त्यांना कोणताही दिलासा देऊ नये. त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आम्ही केली आहे, असे सिंघवी यांनी सांगितले.
कुंवर प्रतापसिंह हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत आणि ते शरद पवार गटासोबत आहेत. परंतु अजित पवार गटाने त्यांचेही खोटे प्रतिज्ञापत्र आपल्या बाजूने सादर केल्याचेही सिंघवी यांनी आयोगाच्या निदर्शनास आणून दिले. कुवर प्रतापसिंह हे स्वतः सोमवारच्या सुनावणीला शरद पवार यांच्यासोबत आयोगात उपस्थित होते.
दुसरीकडे, अजित पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाला संभ्रमात ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रांबाबत काही तांत्रिक चुका असल्याचे या गटाचे नेते सुनील तटकरे यांनी यापूर्वी सांगितले होते.