शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले:ते स्वतःला पूजा करताना देखील दाखवू शकतात, प्रकाश महाजनांची सडकून टीका

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेत ठाण्यात अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्रति तुळजाभवानी मंदिर उभारण्यात आले. शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती तसेच पहलगाम हल्ला या विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आता शरद पवार यांच्यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी टीका केली आहे. प्रकाश महाजन म्हणाले, महाराष्ट्रात फोडण्यासारखे काही नाही, म्हणून शेवटी पवार साहेबांना उपरती आली. बीड जिल्ह्यात तर पवार साहेबांनी नवरा-बायको फोडले. आम्ही तुमच्या देवाचे बाप असे भाषण करणारे पवार आहेत. मी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात न जाता बाहेरच्या कट्ट्यावर गप्पा मारतो, असेही ते म्हणाले आहेत. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ते स्वतःला पूजा करताना देखील दाखवू शकतात, अशी टीका महाजन यांनी केली. शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले पुढे बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, शेवटी पवारांना हिंदू धर्माला शरण जावे लागले. शरद पवार स्वतःची मुंज झालेली पण दाखवू शकतात. हिंदू धर्माच्या दूर जाऊन राजकारण होऊ शकत नाही, हे पवारांच्या लक्षात आलं. धर्माजवळ जाण्याचा हा प्रकार आहे. जितेंद्र आव्हाडांना तुळजाभवानीचे मंदिर बांधावे लागले. ही हिंदूंची ताकद आहे. अतिरेक्यांचा धर्म का लपवायचाय? पहलगाम हल्ला हा देशासाठी धक्का आहे. काही लोक या परिस्थितीला धार्मिक विचार देण्याचा प्रयत्न करत आहेत, असे शरद पवारांनी म्हटले होते. यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले, पवारांनी त्या कुटुंबाची भेट घेऊन देखील त्यांनी अतिरेक्यांनी धर्म विचारल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पवारांना अतिरेक्यांचा धर्म का लपवायचा आहे? हिंदू म्हणून मारले हे सांगायला का वाईट वाटत आहे? पर्यटकांनी धर्मासाठी बलिदान दिले हे त्यांना कधीच कळणार नाही, अशी टीका महाजन यांनी केली आहे. वडेट्टीवारांसारखे मूर्ख काँग्रेसमध्ये जमा झालेत कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का? असे वादग्रस्त विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश महाजन यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, वडेट्टीवारांसारखे मूर्ख काँग्रेसमध्ये जमा झाले आहेत, त्यात कर्नाटकाचे मुख्यमंत्री मागे नाहीत. काँग्रेसचे नेते पाकिस्तान धार्जिणे आहेत. त्यांचे भाषणाचे क्लिप पाकिस्तान दाखवत आहे. पाकिस्तानच्या संसदेत हे लोक आपल्यासोबत असल्याचे सांगितले गेले. आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे बाळासाहेब ठाकरे होते. मात्र उद्धव ठाकरे सर्वपक्षीय सभेला देखील उपस्थित नव्हते. या सर्व लोकांचे राजकारण मुस्लिम धार्जिणे आहे.