‘सिंदूर’ गमावलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया:’ऑपरेशनचे नाव वाचल्यानंतर डोळ्यात पाणी, त्यांना आमची जाणीव’

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे. हे नाव ऐकल्यानंतर आमच्या डोळ्यात पाणी आले, सरकारला आमची जाणीव आहे, हे पाहिल्यानंतर मी अतिशय भावनिक झाले असल्याचे संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे. पहलगाम येथील हल्ल्यात संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला होता. पहलगाम येथील झालेल्या हल्ल्यात 27 भारतीय नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील देखील नागरिकांचा समावेश होता. यामध्ये पुण्यातील संतोष जगदाळे यांचा देखील मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दहशतवाद्यांनी भारताच्या लेकींचा सिंदूर मिटवून टाकला आहे. आज तेच नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑपरेशनला दिले आहे. हे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी आले, त्यांना आमची जाणीव आहे, अशा शब्दात संतोष जगदाळे यांच्या पत्नी प्रगती जगदाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार – आसावरी जगदाळे संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे म्हणाल्या की, “ऑपरेशनचे नाव ऐकून आम्ही खूप रडलो. दहशतवाद्यांनी मारलेल्यांना ही खरी श्रद्धांजली आणि न्याय आहे,” पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळे म्हणाल्या की, या बद्दल मी पंतप्रधान नरेंद मोदी यांचे आभार मानते. ढगफुटीमुळे वैष्णोदेवीऐवजी काश्मीर पर्यटनाला गेले होते संताेष पत्नी प्रगती व मुलगी आसावरी आणि काैस्तुभ गनबाेटे व त्यांची पत्नी संगीता असे 5 जण विमानाने काश्मीरला 10 दिवसांच्या दाैऱ्यावर दिल्लीला गेले हाेते. त्यांचा वैष्णोदेवीला जाण्याचा संकल्प हाेता. परंतु ढगफुटीमुळे त्यांनी काश्मीर खाेऱ्यात फिरावयास जाण्याचा निर्णय घेतला होता. अतिरेक्यांनी जगदाळेंच्या डाेक्यात, पाठीत व मानेला अशा तीन तर गनबाेटेंना पाेटाला व डाेक्याला दाेन गाेळ्या घातल्या होत्या. दाेघे मित्र रक्ताच्या थाराेळ्यात पडून राहिले. डाेळ्यादेखत दाेघांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याने कुटुंबीय भयभीत झाले व मदतीसाठी याचना करत राहिले. परंतु घटनेनंतर बराच वेळ मदत मिळू शकली नाही व भारतीय लष्कर नंतर आल्याने माेठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला. रुग्णालयात नेल्यावर त्यांचा काहीच वेळात दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्रातील मृतांची नावे 1) अतुल मोने – डोंबिवली 2) संजय लेले – डोंबिवली 3) हेमंत जोशी- डोंबिवली 4) संतोष जगदाळे- पुणे 5) कौस्तुभ गणबोटे- पुणे 6) दिलीप देसले- पनवेल हे झाले जखमी 1) एस बालचंद्रू 2) सुबोध पाटील 3) शोबीत पटेल दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात पुण्यातील संताेष जगदाळे आणि काैस्तुभ गनबाेटे या दाेघांना त्यांच्या कुटुंबीयांच्या डाेळ्यासमाेर अतिरेक्यांनी गाेळ्या घालून ठार केले. या दाेघांत गेल्या 25 वर्षांपासून मैत्री हाेती आणि फरसाणच्या व्यवसायाच्या निमित्ताने त्यांच्यात अधिक जवळीक निर्माण झाली हाेती. हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मैत्रीचा करुण शेवटही एकत्रच झाला. जगदाळेंचे एकुलत्या एक एमबीए झालेल्या उच्चशिक्षित मुलीच्या लग्नाचे, तर गनबाेटे यांचे नातवाचे बारसे करण्याचे स्वप्न अधुरे राहिले.