सोमनाथ सूर्यवंशी कोठडीत मृत्यू प्रकरण:विजया सूर्यवंशी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता पुढची सुनावणी 9 जून रोजी

परभणी येथील दंगलीच्या घटनेनंतर मृत्यूमुखी पडलेले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री विजया सूर्यवंशी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेला पुढची तारीख देण्यात आली आहे. या प्रकरणात आता पुढची सुनावणी 9 जून रोजी होणार आहे. या प्रकरणात आज न्यायालयात तिसरी सुनावणी होती. या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर याचिकाकर्त्यांची बाजू मांडत आहेत. परभणी हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडी मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, सोमनाथ मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले होते. आता सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांनी न्यायाची मागणी केली असून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर सुनावणी होत सुरु आहे. प्रकरणाचा तपास सीआयडीकडून सोमनाथ सूर्यवंशी याचा 16 डिसेंबर 2024 रोजी न्यायालयीन कोठडीत असताना मृत्यू झाला होता. त्याच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे समोर आले होते. तसेच सोमनाथचा मृत्यू मारहाणीत झाल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. सोमनाथच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असल्याचेही अहवालातून पुढे आले आहे. आता या प्रकरणाचा तपास सीआयडीकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मागिल सुनावणीत या प्रकरणात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावली होती. अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी यांचा पोस्टमार्टेम ऑन कॅमेरा करण्याची मागणी केली होती. त्यानुसार सोमनाथ सूर्यवंशी यांचे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते. या शवविच्छेदनाचा अहवाल समोर आला होता. त्यात सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या अनेक खुणा स्पष्टपणे दिसत असल्याचेही नमूद करण्यात आले होते. यामुळे वातावरण अधिकच तापले होते.