राज्य नाराजीने नाही, मेहनतीने चालते:माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने मांडले, दीपक केसरकरांचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण
![राज्य नाराजीने नाही, मेहनतीने चालते:माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने मांडले, दीपक केसरकरांचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण](https://images.bhaskarassets.com/thumb/1000x1000/web2images/5483/2025/01/01/new-project-2025-01-01t192059058_1735739509.jpg)
मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर नाराज असल्याची चर्चा होती. शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी आपल्या नाराजीवर पुन्हा एकदा भाष्य केले आहे. नाराजीने राज्य चालत नाही. मेहनतीने राज्य चालते. माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले, असे दीपक केसरकर म्हणाले. दीपक केसरकर यांनी आज शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. नववर्षाच्या पहिल्या दिवशी ते साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांनी त्यांच्या नाराजीबाबत प्रश्न विचारला असता, किती दिवस तुम्ही नाराजी नाराजी करत बसणार? असा प्रतिप्रश्न करत आपण नाराज नसल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. नेमके काय म्हणाले दीपक केसरकर?
आता आणखी किती दिवस नाराजी नाराजी करत बसणार आहोत? आता मंत्र्यांना चांगल्या कामासाठी सदिच्छा दिल्या पाहीजे. त्यांच्या आनंदात आपण सहभागी झाले पाहीजे, असे दीपक केसरकर म्हणाले. नाराजीने राज्य चालत नाही. मेहनतीने राज्य चालते. सत्ता कट करणे हा भाग नसतो. माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले, असा दावा त्यांनी केला. पुढे बोलताना दीपक केसरकर म्हणाले, साईबाबांच्या दर्शनाने एक नवी ऊर्जा प्राप्त होते. मंत्री न बनल्यामुळे मला कोकणवासीयांची सेवा करण्याची संधी मिळेल. गोव्याला एव्हढे लोक जात असतील तर कोकणात का नाही? त्यासाठी साईबाबांनी मला काम करण्याची संधी दिली, असेही ते म्हणाले. बाबांच्या आशीर्वादाने काम लवकर घडते. बाबांकडून आशीर्वाद मागितल्यावर जनतेला सुख समृद्धी लाभेल हा विश्वास असल्याचेही ते म्हणाले. शेतकरी सुखी झाला तर महाराष्ट्र सुखी होतो. नवीन सरकार आलेले आहे. त्यांना साईबाबा शक्ती देवो ही प्रार्थना केल्याचे दीपक केसरकर म्हणाले. सरपंच हत्याप्रकरणी काय म्हणाले केसरकर?
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरही दीपक केसरकरांना विचारले असता, वाल्मिक कराडला शंभर टक्के अटक होईल आणि शिक्षा होईल हे मी अगोदरच बोललोय. तपासाला एवढी पथके लागली होती की सरेंडर झाले नसते तरीही अटक झाली असती. परिवार आणी संबंधितांची खाती सील केली. त्यामुळे दुसरा पर्यायच नव्हता. गुन्हेगार जरी मी सरेंडर झालो म्हणत असला तरी असे काही नव्हते, असे ते म्हणाले. तसेच त्याचा कुणाशी संबध आहे हे सिद्ध झाले नाही. जेव्हा काही सिद्ध होईल तेव्हा त्यावर बोलता येईल. आज कुणाबाबत बोललो तर कुणाचीतरी बदनामी करणे होईल. पोलिसांना निष्पक्ष चौकशी करण्याची संधी द्यायला हवी, असेही ते म्हणाले.