म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : परतीच्या पावसाचे वेध लागल्यामुळे मराठवाड्यात चिंता वाढली आहे. पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे मोठी तूट निर्माण झाली आहे. पुढील तीन दिवसात समाधानकारक पाऊस पडण्याचा अंदाज आहे. धरणात पाणीसाठा नसल्यामुळे विभागात बिकट स्थिती आहे.

मराठवाड्यात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे. विभागात ४८ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीनचे ५३.२ टक्के क्षेत्र आहे. कापूस, तूर, मका आणि बाजरीचे त्या खालोखाल क्षेत्र आहे. पाऊस नसल्यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. पिकांची उत्पादकता निम्मी घटणार असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. पिकांच्या नुकसानीची पाहणी कृषी आणि महसूल विभाग करीत आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादन कमी झाल्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारणावर प्रतिकूल परिणाम होणार आहे.

यावर्षी विभागात जून ते सप्टेंबरचे सरासरी पर्जन्यमान ६१३ मिलिमीटर आहे. मात्र, आतापर्यंत ४६४ मिमी पाऊस झाला आहे. नांदेड, लातूर आणि हिंगोली जिल्हे वगळता इतर पाच जिल्ह्यात भीषण परिस्थिती आहे. आता परतीच्या पावसाचे वेध लागले आहेत. मागील आठवड्यात तीन दिवस पावसाने हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. येत्या २२ ते २४ सप्टेंबर दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात चक्रवात निर्माण झाल्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होणे अपेक्षित आहे.

लोकसभा निवडणूक वेळेवर होणार पण महाराष्ट्रात मध्यावधी लागणार, विनायक राऊतांचा खळबळजनक दावा, म्हणाले..

दरम्यान, प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार २१ सप्टेंबर रोजी हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यात पाऊस होईल. २२ आणि २३ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड व जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होईल. वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

चक्रवात निर्माण झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात २२ ते २४ सप्टेंबर या कालावधीत पाऊस पडणे अपेक्षित आहे. या पावसामुळे विभागातील पावसाची तूट बऱ्यापैकी भरुन निघेल. परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झाला आहे.

-श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम विज्ञान केंद्र



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *