म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मुंबईतील प्रदूषणाची समस्या ऐन दिवाळी सणात गंभीर बनल्याने हे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकार खडबडून जागे झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी यांसंदर्भांत बैठक घेऊन मुंबई परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना ॲक्शन मोडवर राबविण्याचे निर्देश दिले. त्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी एकत्रितपणे प्रदूषणमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने मोहीम स्वरूपात काम करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबईतील रस्त्यांवरील धुळीला आळा घालण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यासाठी एक हजार टँकर लावावेत. त्यासाठी विशेष पथक नियुक्त करावे. ‘एमएमआरडीए’ची बांधकाम स्थळे धूळमुक्त आणि स्वच्छ करावीत. ॲण्टी स्मॉग गन, स्प्रिंकलर्सचा वापर वाढवावा, अशा सूचना शिंदे यांनी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना केल्या.

मुंबई आणि परिसरात प्रदूषणाची समस्या गेल्या काही दिवसांत खूपच वाढली आहे. या प्रदूषणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत प्रदूषणाची समस्या आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना राबविण्याच्या सूचना शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मुंबईसह महानगरांमधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका, तसेच राज्य सरकारच्या विविध यंत्रणांनी एकत्रित कार्यवाही करावी. नागरिकांना प्रदूषण रोखण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी करून लोकचळवळ निर्माण झाली पाहिजे, असे शिंदे यांनी सांगितले.

मुंबईत शेकडो वर्षे जुना ब्रिटिशकालीन रेल्वे उड्डाणपूल बंद होणार, प्रवाशांसाठी तात्पुरता पूल उभारणार
पाण्याची फवारणी…

मुंबईत विविध ठिकाणी सुरू असलेली बांधकामे, विकास प्रकल्पांची कामे यामुळे धुळीचे साम्राज्य पसरू नये म्हणून पाण्याची फवारणी करून रस्ते स्वच्छ करावीत. त्याचबरोबर साचलेली धूळ साफ करण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. रस्ते धुण्यासाठी टँकरची संख्या एक हजारपर्यंत वाढवावी, असेही त्यांनी सांगितले. मुंबईसह महानगर परिसरात ‘एमएमआरडीए’मार्फत विकास कामे सुरू आहेत. अशा बांधकाम ठिकाणांवर धूळ रोखण्यासाठी पत्रे लावतानाच ही सर्व ठिकाणे धुळमुक्त करण्याचे निर्देश शिंदे यांनी दिले. कामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या पत्र्यांमुळे रस्त्यावरून जाताना नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

माती, डेब्रीज झाकून न्यावे

राज्यातील सर्व महापालिका, शहरांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे आणि मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करतानाच शहरातील सर्वाधिक प्रदूषण होणाऱ्या ठिकाणांवर नियंत्रण करावे. वाहनांमधून रस्त्यांवरील माती, डेब्रीज वाहून नेताना ती झाकून वाहतूक करावी. तसे न करणाऱ्या वाहनांवर वाहतूक विभागाने कारवाई करावी, असे शिंदे यांनी सांगितले.

वन क्षेत्र वाढवावे

राज्यातील महानगरांमध्ये नागरी वन क्षेत्र (मियावाकी) वाढविण्यासाठी महापालिकांनी पुढाकार घ्यावा. धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी स्प्रिंकलर्सचा वापर करा. हवेतील प्रदूषणावर उपाययोजना करताना संनियंत्रण करणे आवश्यक आहे. मुंबईमधील धुळीचे प्रदूषण कमी करण्यासाठी क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा दर आठवड्याला आढावा सादर करण्याच्या सूचनाही शिंदे यांनी केल्या. यावेळी आयआयटीच्या तज्ज्ञांनी प्रदूषण कमी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत माहिती दिली. प्रदूषणामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी या तज्ज्ञांनी केले.

कुत्रिम पाऊस पाडणार का?

बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ‘क्लाउड सिडिंग’ अर्थात कृत्रिम पाऊस पाडण्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. दिल्लीत प्रदूषण वाढल्याने तिथे कृत्रिम पाऊस पाडण्याची शक्यता आहे. या धर्तीवर मुंबईतही कृत्रिम पाऊस पाडणार का, असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले की, मुंबईत कृत्रिम पावसाची आवश्यकता नाही. कालच मुंबईत पाऊस पडला. परंतु, पुढे आवश्यकता भासल्यास त्यासंबंधीच्या सूचना आयुक्तांना देण्यात आल्या आहेत.

सेमी फायनलसाठी काय आहेत आयसीसीचे नियम, गुण आणि रन रेटही सारखा झाला तर काय होणार जाणून घ्या…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *