पालघर जिल्ह्यात मुंबई- वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या उभारणीचे काम प्रगती पथावर सुरू आहे. जीआर इन्फ्रा कंपनीकडे मार्ग बांधकामाचा ठेका असून द्रुतगती महामार्गासाठी वैतरणा नदीपात्रात पुलाचे बांधकाम सुरू आहे. द्रुतगती महामार्गाच्या पूल उभारणीचे काम करणाऱ्या कामगारांना घेऊन नदीपात्रातून परतणारी बोट नदीपात्रात बुडल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. नदीपात्रात पूल उभारण्याचे काम करणाऱ्या कामगारांना नदीपात्रातून ने- आण करण्यासाठी स्टील प्रवासी बोट वापरण्यात येते. मात्र, ही स्टील प्रवासी बोट बिघडल्याने टंक बोट वापरून नदीपात्रात असलेल्या या कामगारांना नदीकिनारी आणण्यात येत होते. कामगारांना घेऊन ही बोट परतत असतानाच वैतरणा नदी पात्रात ही बोल उलटली आणि बुडाली. वैतरणा नदी पात्रात वाढीव- वैतीपाडा नजीक ही दुर्घटना घडली आहे. नदीपात्रातून कामगार घेऊन येत असलेल्या या टंक बोटीत एका बाजूने बसल्याने बोट एका बाजूला कलंडली आणि नदी पात्रात बुडाल्याची माहिती आहे. बोट नदीत बुडत असल्याचे निदर्शनात येताच बोटीतील काही कामगारांनी नदीपात्रात उड्या मारल्या तसेच काही कामगार पोहत नदी किनारी पोहोचले.
घटनेची माहिती मिळताच पालघरचे प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी, सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी व राष्ट्रीय यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. सदर बोट दुर्घटनाग्रस्त झाली त्यावेळी या बोटीत २४ कामगार होते. त्यापैकी २२ कामगारांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र, दोन कामगार अद्यापही बेपत्ता असून आदर्श मिश्रा आणि निर्मल शुक्ला अशी बेपत्ता कामगारांची नावे आहेत. स्पीड बोट, बोट व इतर माध्यमांच्या मदतीने बेपत्ता असलेल्या दोन कामगारांचा शोध प्रशासकीय यंत्रणा घेत आहे.
नदीपात्रातून कामगारांची ने- आण करताना त्यांना सुरक्षिततेसाठी लाईफ जॅकेट देण्यात आले नाही. कमी क्षमतेच्या बोटीतून अधिक कामगार बसविण्यात आले का? त्याचप्रमाणे बांधकाम करताना देखील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत की नाही ? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून या दुर्घटनेमुळे मुंबई- वडोदरा द्रुतगती महामार्गाचे बांधकाम करणाऱ्या कामगारांचा प्रश्न सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News