वाल्मीक कराड स्वतःहून शरण आला यात पोलिसांचे अपयश:अजूनही 3 आरोपी फरार आहेत, अनिल देशमुख यांची टीका
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाल्मीक कराड शरण प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुख म्हणाले, मला असे वाटते की गेल्या 22 दिवसांपासून वाल्मीक कराड फरार होते. एवढ्या दिवसात महाराष्ट्रातील पोलिस त्यांना शोधू शकली नाही. शेवटी पुण्यात वाल्मीक कराड स्वतःहून शरण आला. हे एका अर्थी अपयश म्हणावे लागेल. एवढे आंदोलन होत आहेत, तरी देखील आरोपी सापडत नाहीत. अजूनही 3 आरोपी अद्याप फरार आहेत. लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे. अनिल देशमुख म्हणाले, परभणीची घटना सोमनाथ सूर्यवंशीची, कल्याणची घटना विशाल गवळीची, त्याचसोबत अकोला पातूरमध्ये तसेच बीडमध्ये हवेत गोळीबार करणारे सापडत आहेत, अशा अनेक घटना महाराष्ट्रात घडत आहेत. नागपूरमध्ये 36 तासांत तीन खून झाले आहेत. या सगळ्या घटना घडत आहेत यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रातली सुधरली पाहिजे. लाखो लोक रस्त्यावर येतात आणि आक्रोश करतात आणि तो आरोपी 23-23 दिवस फरार राहतो, त्यामुळे आता पोलिसांनी तातडीने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी देखील संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मीक कराडवर मोक्का लावला पाहिजे, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली आहे. संभाजीराजे म्हणाले, खंडणीच्या गुन्ह्यात नोंद केली आणि नंतर बेल घेऊन बाहेर पडणार हा खेळखंडोबा आम्ही सहन करणार नाहीत. तुम्ही मोका कसे लावणार, खुनाचा गुन्हा कसा लावणार यावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे. धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये हे देखील मी म्हणालो आहे. तसेच त्यांना पालकमंत्री केले तर मला बीडचे पालकत्व घ्यावे लागेल असे मी म्हणालो आहे. त्यांना मंत्रीपदावरच घ्यायला नको आहे, त्याशिवाय न्याय मिळणार नाही.