वाल्मीक कराडलाही ‘मकोका’ लावा:हत्येमागे ‘आका’च मेन, सुरेश धस संतापले; अजित पवारांनाही मंत्रिमंडळात बदल करण्याची मागणी

वाल्मीक कराडलाही ‘मकोका’ लावा:हत्येमागे ‘आका’च मेन, सुरेश धस संतापले; अजित पवारांनाही मंत्रिमंडळात बदल करण्याची मागणी

बीड मधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सात आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. मात्र उरलेल्या आठव्या आरोपीला सुद्धा मकोका लावला पाहिजे. त्याच्यावर देखील 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. या हत्येमध्ये आका सुद्धा आहे. तोच मेन असल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना कडक शिक्षा करण्याच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी धस बोलत होते. या प्रकरणातील वरच्या आकाने 19 ऑक्टोंबर रोजी स्वतःच्या सातपुडा या बंगल्यावर बैठक घेतली. त्यामुळे तो यामध्ये आरोपी का नाही? असा सवाल धस यांनी उपस्थित केला. संतोष देशमुख यांची हत्या केवळ दीड कोटी रुपयांसाठी केली गेली. दीड कोटी नाही तर आम्ही तीन कोटी गोळा करून तुम्हाला दिले असते. मात्र आमच्या माणसाला अशा पद्धतीने तुम्ही मारायला नको होते, असे देखील धस यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात कोणत्याही प्रकारचा जातिवाद केला जात नसल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन हटवा, सुरेश धसांची अजित पवारांकडे मागणी मंत्री धनंजय मुंडे यांचे ड्रग्ज प्रकरणातील आरोपींसोबत फोटो आहेत. त्यामुळे अजित पवारांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरुन दूर करून त्यांच्या जागी मनोज कायंदे यांना संधी द्यावी, अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. तुमच्या पक्षातील अनेक आमदार निवडून आले आहेत. त्यातील कोणालाही संधी द्या, मात्र, यांना मंत्रिमंडळातून बाजूला करा, अशी मागणी देखील धस यांनी केली. त्यांनी भर दिवसा हत्या केली पुढील काळात ते सकाळी देखील हत्या करतील, असा इशारा देखील धस यांनी दिला आहे. पोलिसांनीच समजून सांगण्याचे आवाहन आज 7 जणांना मकोका लागला. एकाला बाजूला ठेवण्यात आले आहे. त्याच्यावरही मकोका लावण्यात आला पाहिजे. आका सध्या आपला या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा करत असेल, पण तोच मुख्य आहे. वरच्या आकानेही 19 ऑक्टोबरला आपल्या सरकारी सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली होती. ही बैठक घेणारा मंत्री या प्रकरणात आरोपी कसा नाही? हे मला पोलिसांनी समजावून सांगावे, असे सुरेश धस म्हणाले. दोघांनाही बिनभाड्याच्या खोलीत टाका अॅट्रोसिटी दाखल करू नका म्हणून आकाने पोलिसांना फोन केला होता. त्यानंतर आका त्याच्या आकाशी बोलला असेल. तर आकाही या प्रकरणात आरोपी होतील. या दोघांनाही बिनभाड्याच्या खोलीत टाकले पाहिजे. यांना जिल्ह्याच्या गरम बराकीत जाऊ द्या, अशी माझी पोलिसांना विनंती आहे. या लोकांनी बाहेर कितीही टारटूर केली तरी या गरम बराकीत गेले की देव आठवतात, असेही सुरेश धस म्हणाले. संतोष देशमुखला हाल हाल करून मारले सुरेश धस यांनी यावेळी मारेकऱ्यांनी संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारल्याचा आरोप केला. संतोष देशमुखला सलग 4 तास मारहाण झाली. त्यांनी पाणी मागितले तर त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आली, असे ते म्हणाले. तुम्ही त्यांची धिंड काढली असती तरी आम्ही तुमचे अत्याचार सहन केले असते. मात्र, तुम्ही त्यांचा जीव घ्यायला नको होता. आता त्यांच्या निष्पाप मुलांनी कोणाकडे पाहायचे? असा प्रश्न धस यांनी उपस्थित केला.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment