महाराष्ट्राला मिळाले नवे मुख्य सचिव:राजेश कुमार यांनी स्वीकारला पदभार, म्हणाले – विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार महाराष्ट्राला मिळाले नवे मुख्य सचिव:राजेश कुमार यांनी स्वीकारला पदभार, म्हणाले – विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार

महाराष्ट्राला मिळाले नवे मुख्य सचिव:राजेश कुमार यांनी स्वीकारला पदभार, म्हणाले – विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार

महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून 2047 च्या विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या संकल्पनेच्या दिशेने सर्वांच्या सहकार्याने काम करणार असल्याचे राज्याचे 49 वे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी सांगितले. शासनाने राज्याच्या मुख्य सचिव पदी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केली आहे. मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रशासकीय अधिकारी तसेच मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्या वतीने सौनिक यांचा तसेच वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शाल, पुष्पगुच्छ, मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच नवे मुख्य सचिव राजेश कुमार यांचे शाल, पुष्पगुच्छ, देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी माजी मुख्य सचिव मनोज सौनिक, राजेश कुमार यांच्या पत्नी श्रीमती अर्चना राजेश कुमार आदी यावेळी उपस्थित होते. मुख्य सचिव राजेश कुमार म्हणाले, आपल्या मुख्य सचिव पदाच्या कालावधीत सर्व विभागांच्या सचिवांच्या सहकार्याने सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रयत्न करण्याला प्राधान्य दिले जाईल. लोकांची कामे त्या-त्या ठिकाणीच व्हावीत, त्यांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये यासाठी राज्य शासनाच्या सर्व विभागांच्या योजनांना अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाईल. सर्व क्षेत्रांमध्ये प्रगत असलेल्या महाराष्ट्राला अधिक उत्कृष्ट आणि नाविन्यपूर्ण कामाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. शासन ही लोकसेवा करण्याची संधी –सुजाता सौनिक मावळत्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक यांनी यावेळी महाराष्ट्रासारखे दुसरे राज्य नाही, महाराष्ट्र हा एक विचार असून हा विचार कर्तृत्वाचा आणि नवचैतन्याचा असल्याचे सांगितले. सौनिक म्हणाल्या, अशा राज्यात शासन ही सत्ता नसून येथे नेतृत्व करायला मिळणे म्हणजे परिणाम घडविण्याची, लोकसेवा करण्याची संधी आहे. राज्य शासनाने मला ही सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि या ऋणाची परतफेड सेवेच्या नवीन स्वरुपात करत राहीन. लोकांच्या जीवनामध्ये बदल घडविण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राज्यातील जनतेचेही आभार मानले. राजेश कुमार यांचा अल्पपरिचय आणि आतापर्यंत भूषवलेली पदे मुख्य सचिव राजेश कुमार (भाप्रसे 1988) यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे. राजेशकुमार यांनी सोलापूर येथे अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 रोजी आपल्या कारकीर्दीस सुरूवात केली. त्यानंतर सातारा येथे सहायक जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त, धाराशीव जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिका आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव, नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त, नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल व वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केले आहे.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *