देव जेवले हो देव जेवले, या डोळ्यांनी मी पाहिले, कमरेचा तो काढून हात, कालवला दहीभात रुसू नको ज्ञाना, ये बैस पाटी, घालते तुजला रांगोळी मोठी उदबत्त्या समई, रांगोळी दाट, नक्षीच्या पाटावर बैसे जग जेठी…. अशी विनवणी करीत कैवल्य साम्राज्य संत ज्ञानेश्वर महाराजांना पालखी सोहळ्यामध्ये दररोज पंचपक्वानांचा महानैवेद्य संस्थानतर्फे दाखवण्यात येतो. संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा जिल्ह्यात दाखल झाल्यानंतरच जेवणाचा पहिला विसावा, कारुंडे येथे असतो. सोहळा सकाळी अकरा वाजेदरम्यान विसावाच्या ठिकाणी दाखल झाला. पण, सकाळी आठ वाजल्यापासून त्या परिसरातील एका तंबूमध्ये देवाच्या महानैवेद्याची लगबग सुरू होती. कऱ्हाड (सातारा) येथील सुनंदा कुलकर्णी, प्रतिभा घोडके या भगिनी, त्यांच्या सहकारी सोवळ्यामध्ये नैवेद्याची तयारी सुरू करतात. पालखीच्या तळावर माउलींच्या महानैवेद्यासाठी संस्थानतर्फे स्वतंत्र तंबूमध्ये व्यवस्था करण्यात येते. असा असतो महानैवेद्य.. शेवयांची खीर, बेसनाचे लाडू, गुलाबजाम, बासुंदी, सुधारसाचा प्रसाद दररोज महानैवेद्यामध्ये पुरणपोळी, शेवयांची खीर, बेसनाचे लाडू, गुलाबजाम, बासुंदी, सुधारस, आमरस, चटणी, डाळिंबाची कोशिंबीर, डाळिंबाचे दाणे घालून कोशिंबीर, पाकपुऱ्या, श्रीखंड, मुगाच्या डाळीची खिचडी, भजी असा नैवेद्य तयार करण्यात येतो. केसरयुक्त पाणी असते व गोविंद विडा असतो. नेवैद्य तयार करून तो चांदीच्या ताटामध्ये वाढण्यात येतो. त्यासोबत पेजसाठीचे चौपाळे असते. त्यामध्ये हळद-कुंकू, अक्षता, अत्तर, फुलं असतात. नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र ठेवण्यात येते. एकादशीला नैवेद्यात फराळाचे पदार्थ असतात. त्यामध्ये भगर, श्रीखंड, फळं आदी असतात. दुपारी जेवणासाठी पालखी सोहळा थांबतो, त्या ठिकाणी महानैवेद्य दाखवण्यात येतो. नैवेद्य तयार झाल्यानंतर तो नेण्यासाठी सेवेकरी पट्टेवाले येतात. त्यांच्यासमवेत पौरोहित्य करणारे गुरुजी असतात. नैवेद्य पालखी तळावर नेल्यानंतर दर्शनबारी थांबवण्यात येते. माउलींच्या पादुका चांदीच्या पाटावर घेण्यात पादुकांची पूजा करण्यात येते. त्यास अत्तर लावण्यात येते. त्यावर फुलं-तुळशीपत्र वाहण्यात येते. त्या पानाभोवती पडदा धरून, माउलींनी शांतपणे जेवण करावे, अशी प्रार्थना करण्यात येते. इतर सहकाऱ्यांची मदत होत असल्याची भगिनींची भावना कमरेचा तो काढून हात, कालवला दहीभात, हळूच भुरके मारीयले, आेरपली याने खीर थोडी, तोंडी लावली कोशिंबिरी, मोर मुरडीचा कानवला, देव जेवले हो देव जवले… अशी गाणी म्हणण्यात येतात. त्यानंतर पौरोहित्य करणारे गुरुजी आम्हाला तीर्थ देतात. माउलींचे तीर्थ हेच त्या दिवसातील आम्ही घेतलेला पाण्याचा पहिला घोट असतो. पहाटे स्नान केल्यानंतर संपूर्ण स्वयंपाक पूर्ण करून माउलींचे जेवण होईपर्यंत अखंड नामस्मरण आम्ही व आमच्या इतर सहकाऱ्यांची मदत होते, असे सुनंदा व प्रतिभा या भगिनींनी सांगितले.