पालख्यांमुळे वाहतूक कोंडी होते, पण आम्ही तक्रार करत नाही असे म्हणत अबू आझमी यांनी पंढरीच्या वारीतील पालखीचा आणि रस्त्यावरील नमाज पठणाचा संबंध जोडला होता. यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. त्यात आता भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी देखील अबू आझमी यांच्यावर निशाणा साधला आहे. आम्ही हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केले तर? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. अबू आझमी यांनी केलेल्या विधानावर पलटवार करताना नितेश राणे म्हणाले, दर शुक्रवारी जे गॅस सिलेंडर वरती येतात त्यावर आझमी सारखे कारटे काहीच बोलताना दिसत नाही. आमच्या महाकुंभवर, आमची वारी सुरू झाली तर त्यावर आक्षेप घ्यायचा. आमची वारी वर्षभर असत नाही पण तुमच्या दररोज वर येणाऱ्या गॅस सिलेंडरवर बोला, त्यावर अबू आझमीने आपले थोबाड उघडावे, अशी टीका राणेंनी केली आहे. वारी वर बोलण्याची हिंमत कोणी करू नये पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, हे आम्ही इथे खपवून घेणार नाही, आम्ही उद्या हज यात्रेवर प्रश्न उपस्थित केला तर चालेल का? असा सवालही नितेश राणेंनी उपस्थित केला. तर, वारी वर बोलण्याची हिंमत कोणी करू नये, आमची वारी अशीच सुरु राहणार असल्याचेही त्यांनी म्हटले. आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही दरम्यान, हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर देखील नितेश राणे यांनी आपली भूमिका मांडली आहे. ते म्हणाले, आपल्या हिंदू राष्ट्राला तोडण्याचे फार मोठे षड्यंत्र आहे. इस्लामिक राष्ट्र बनविण्याचे मनसुबे आखले जात आहेत त्याला आपण खत पाणी टाकतोय का? आमच्या सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, पण मराठी सक्ती निश्चित आहे. हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या पण हिंदू राष्ट्राला तोडण्याचे प्रयत्न होत असतील. तर इस्लामिक राष्ट्र बनविण्याच्या प्रयत्नाला तुम्ही हातभर लावताय का याचा विचार करुन आंदोलन करावे. हिंदूंमध्ये भांडण म्हणजे जिहाद्यांना मदत, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली. सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले, गद्दार कोण ह्यावर पुस्तक लिहिण्याची गरज आहे. सर्वात मोठा गद्दार म्हणजे संजय राऊत आहे. उबाठा आणि उद्धव ठाकरेंची जी अवस्था झालीय, त्याला राऊतच जबाबदार आहे. राऊताने स्वतःला आरशात पहावे आणि मग आरोप करावे.