अमित ठाकरेंचे राज – उद्धव युतीवर मोठे भाष्य:म्हणाले – दोघांकडेही एकमेकांचे नंबर, इच्छा असेल तर त्यांनी एकमेकांना फोन करावा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे गट एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. या बाबत मनसे नेते अमित ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरे यांना सल्ला दिला आहे. त्यांना युती करायची असेल तर उद्धव ठाकरेंनी फोन करावा. मीडियात किंवा वृत्तपत्रात बोलून युती होत नसल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. या संदर्भात पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या बाजूने भूमिका स्पष्ट केली आहे. सध्या मीडियात दोन भाऊ – दोन भाऊ असे बोलले जात आहे. मात्र, यात युतीसंदर्भात त्या दोन भावांनी बोलायला हवे. खालील नेत्यांपैकी कोणी कितीही बोलून काही उपयोग होणार नाही. मी 2016 -17 किंवा कोविड काळात देखील हे बघितले आहे. त्यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पहिला फोन केला होता. कोरोना हे भयंकर संकट आहे. कोणतेही सरकार असो आपण त्यांची साथ द्यायला हवी, असे राज ठाकरे यांनी म्हटले होते. मात्र, आता केवळ वर्तमानपत्रात बोलून अशा युती नसल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. या विषयी बोलताना अमित ठाकरे यांनी म्हटले की, वृत्तपत्रातून किंवा माध्यमांतून कोणत्याही दोन पक्षांमध्ये युती होत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र तथा मनसे नेते अमित ठाकरे यांनी या बाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोघांनी एकत्र येण्यास आमची काहीही हरकत नाही. दोघ भाऊ एकत्र येण्यात मला काहीही इशू नाही. मात्र त्या दोन भावांनी बोलला पाहिजे, असे देखील अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा मात्र मीडियात बोलून किंवा वर्तमानपत्रात बोलून काहीही होत नसल्याचे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे. प्रस्ताव आल्यास राज ठाकरे निर्णय घेतील – संदीप देशपांडे युती बाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. ज्या दिवशी राज ठाकरे यांच्याकडे प्रस्ताव येईल, त्या वेळी युती बाबत राज ठाकरे निर्णय घेतील. असे म्हणत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी युतीचा चेंडू पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्याकडे टोलवला आहे. हे सर्व दूरून डोंगर साजरे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. ‘नजर ने बात कहीं, नजर को देखकर, नजर से किया इशारा नजर नजर का खेल है | असे देखील देशपांडे यांनी म्हटले आहे. या बाबत चालू असलेली चर्चा केवळ दुरून डोंगर साजरे असल्याचे ते म्हणाले. यामध्ये ठोस कोणताही प्रस्ताव आम्हाला आलेला नाही. ज्या दिवशी येईल, त्या दिवशी निश्चितपणे राज ठाकरे यावर निर्णय घेतील, असे देखील संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

  

Share