..असा झाला शिवरायांचा राज्याभिषेक:माझा राजा आज छत्रपती शिवाजी महाराज झाला, डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा

सकाळपासूनच रायगडावर लगबग सुरू होती. सगळीकडे झेंडूच्या फुलांचे हार, तोरणे लावली जात होती. आज प्रत्येक मावळ्याच्या तसेच लहानापासून मोठ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून येत होता. कामामध्ये सुद्धा उत्साह होता, कितीही मोठे काम असले तरी प्रत्येकजण स्वतःहून पुढाकार घेऊन सगळी कामे करत होता. तसे पाहायला गेले तर आज निसर्गही बहरून गेला होता, जणू सारी सृष्टीच राजांच्या राज्याभिषेकासाठी सज्ज झाली होती. होय, माझ्या राजाचा राज्याभिषेक सोहळा आहे. स्वराज्याची स्थापना करून मराठी माणसाच्या मनात स्वातंत्र्याची नवी पहाट घेऊन आलेल्या माझ्या शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा. गुलामगिरीतून मुक्त करणाऱ्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. अन्यायाच्या विरोधात लढा देणाऱ्या शिवबांचा राज्याभिषेक सोहळा. शत्रूंशी लढताना जणू महादेवाच्या रूपात तांडव करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा. कित्येक वर्षांचे उरी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण होत होते. लहान वयातच भविष्याचा विचार करून, जनतेचा विचार करून, मायभूमीचा विचार करून स्वराज्य स्थापन केले. मूठभर मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि याच स्वराज्याला आज मोठे रूप आले. पेरलेल्या बिजाचे मोठे वृक्ष तयार झाले होते. आणि या मराठी साम्राज्याच्या राजांचा आज राज्याभिषेक सोहळा, त्यामुळे सगळीकडेच एक वेगळा उत्साह पसरला होता. चला, मी तुम्हाला या सोहळ्यात घेऊन जातो.. राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी करायचा ठरला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 रोजी करायचा ठरला होता. आज तारीख होती 29 मे, आजपासूनच राज्याभिषेकाच्या विधींना सुरुवात झाली होती. पहाटे लवकर उठून शिवाजी महाराजांनी स्नान करून देवाचे दर्शन घेतले आणि कार्य मंडपात आले. त्यांचे रूप इतके तेजस्वी दिसत होते की सर्वांच्या नजरा फक्त आणि फक्त त्यांच्यावरच खिळल्या होत्या. मी काय वेगळा, माझेही डोळे शिवरायांवरच स्तब्ध झाले होते. पिळदार शरीरयष्टी, सरळ नाक, भेदक डोळे, चेहऱ्यावर एक स्मित हास्य, वागणुकीत एक आदबी, दिसायला सिंहासारखे परंतु तितकीच नम्रता. शिवाजी महाराजांचे रूप पाहून उपस्थित सर्वच हरखून गेले होते. काशीवरून साक्षात गागा भट्ट उपस्थित होते आज शिवाजी महाराजांच्या मुंजीचा सोहळा आयोजित केला होता. ब्राह्मणांच्या साक्षीने, वेद मंत्रोच्चारात मौजीबंधन कार्यक्रम संपन्न झाला. शास्त्रानुसार आता शिवाजी महाराजांना पुन्हा आपल्या राण्यांशी विवाह करणे आवश्यक होते. त्यानुसार 30 मे रोजी शिवाजी महाराजांनी समंत्रक विवाह केले. या विवाहामुळे राजा म्हणून शिवाजी महाराज आणि पट्टराणी म्हणून सोयराबाई यांना राज्याभिषेकासाठी लागणारे हक्क शास्त्रानुसार प्राप्त झाले. स्वराज्याचे युवराज म्हणून संभाजी महाराजांच्या नावाची द्वाही फिरली. या सगळ्या सोहळ्यांना काशीवरून साक्षात गागा भट्ट उपस्थित होते. त्यामुळे हा राज्याभिषेक काही सामान्य नव्हताच त्यात महान विद्वान पंडित सुद्धा उपस्थित होते.
आजचा दिवस या सोहळ्यात कसा मावळतीस आला समजलेच नाही. सूर्य मावळतीला जरी जात असला, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर थकवा दिसत असला तरी देखील मनात आनंद होता, नवा सूर्य उगवणार होता. दुसऱ्या दिवशीची तयारी आतापासूनच सुरू केली होती. उद्या म्हणजे 31 मे रोजी ऐन्द्रीशांतीचा कार्यक्रम होता. त्यासाठी लागणारे साहित्य सामग्री तसेच मंडप व्यवस्था करण्यात येत होती. सगळी तयारी रात्र होण्यापूर्वीच करून घेतली. सकाळी लवकरच ऐन्द्रीशांतीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. महाराजांनी पहाटेच स्नान करून पूजेसाठीचे वस्त्र परिधान केले होते. यावेळी अग्नीप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा, चतुष्कभस्थापन वगैरे विधी पार पडले. यानंतर आचार्य आणि ऋत्विज यांना सुवर्णदक्षिणा देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमानंतर दिवस असे पटापट निघून जात होते. 1 तारखेला म्हणजे 1 जूनला गृहयज्ञ केले व लगेच त्यानंतर नक्षत्रहोम हा विधी करण्यात आला. 3 जूनला नक्षत्र यज्ञ झाला व त्यानंतर 4 जून रोजी रात्री निर्ऋतियाग हा यज्ञ पार पडला. यागानंतर स्नान करून पुण्याहवाचन करण्यात आले. राज्यभिषेकाचा मुहूर्तं त्रयोदशीचा आम्ही मंडपात पोहोचलो तेव्हा सकाळची पूजा वगैरे पार पडली होती. दुपार होत आली तसे ब्राह्मणभोजन आणि ऐन्द्रीशांतीच्या मुख्य कार्यांची समाप्ती करण्यात आली. राज्यभिषेकाचा मुहूर्तं त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळपासून पहाटेपर्यंत हा मंगलविधी सुरू होता. काही वेळासाठी सर्वांनीच विश्रांती घेतली. अखेर तो दिवस उजाडला. 6 जून 1674. राज्याभिषेकाचे विधी पहाटे तीन वाजल्यापासूनच सुरू झाले होते. कोणालाच झोप लागत नव्हती, कारण प्रत्येकाला हा ऐतिहासिक, न भूतो, न भविष्यती असा हा सोहळा आपल्या डोळ्यांनी. पाहत मनात साठवून घ्यायचा होता. पहाटेच्या समयी शिवाजी महाराजांनी गंगेच्या पाण्याने स्नान केले. स्नान केल्यावर कुलदैवत महादेव आणि आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. सुवर्ण आसनाची व्यवस्था करण्यात आली अभिषेक करण्यासाठी सुवर्ण आसनाची व्यवस्था करण्यात आली होती. देव दर्शन घेतल्यानंतर महाराज आसनाकडे आले व त्या सुवर्ण आसनावर विराजमान झाले. शिवाजी महाराजांनी यावेळी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. जेव्हा शिवाजी महाराज त्यावर बसले तेव्हा खऱ्या अर्थाने त्या आसनाला सुवर्णत्व प्राप्त झाले असे मला वाटले. दोन फूट लांब-दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले होते. त्यांच्या शेजारी उपरण्याला साडीचे टोक बांधलेल्या सोयराबाई बसल्या होत्या. या दोघांना पाहताना महादेव आणि पार्वतीच मनात येत होते. इथेच दुसऱ्या मंचावर बाळ शंभुराजे बसले होते. यावेळी तिथे संपूर्ण देशभरातील पवित्र नद्यांचे पवित्र जल कलशांमध्ये ओळीने भरून ठेवले होते. अनेक पुरोहित, अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांनी हे सर्व पवित्र जलकुंभ महाराजांच्या शिरावर अभिषेक केल्यासारखे ओतले. या विधीनंतर महाराजांनी सर्वांना सन्मानित करताना सुवर्णकमळ, सुवर्णपुष्पे दिली, मानाची वस्त्रे दिली तसेच जमलेल्या सर्व ब्राह्मणांना प्रत्येकी 100 होनांचे दान दिले, तर मुख्य भटांना 5000 होन देण्यात आले. थोर थोर नदीयांची उदके, तिर्थोदके आणली हा विधी पार पडला आणि त्यानंतर लगेचच मुख्य प्रधान मोरोपंत पिंगळे यांनी शिवरायांना मुजरा करत 8 हजार होनांनी महाराजांवर अभिषेक केला व पाठोपाठ मुख्य हिशेबनीस निळो पंडितांनी 7 हजार होनांनी अभिषेक केला. सभासद बखरमध्ये या प्रसंगाचे वर्णन करताना असे लिहिले की, “तख्त सुवर्णांचे बत्तीस मणांचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशांत होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची राणे जडाव केली. सप्त महानदियांची उदके व थोर थोर नदीयांची उदके, तिर्थोदके आणली. सुवर्णांचे कलश केले. सुवर्णांचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्ट प्रधानांनी राजियांस अभिषेक करावा, असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला.” शिवाजी महाराज राज्याभिषेक दालनाकडे निघाले यानंतर शिवाजी महाराजांनी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक सुंदर असा राज मुकुट घातला. शिवाजी महाराजांनी आपल्या शस्त्रांची पूजा केली. ढाल, तलवार आणि धनुष्यबाण सजवून ठेवण्यात आले होते. हे सर्व परिधान करून शिवाजी महाराज राज्याभिषेक दालनाकडे निघाले. अगदी मुहूर्ताच्या वेळी शिवाजी महाराजांनी दालनात प्रवेश केला. राज्याभिषेकाचे दालन हिंदू परंपरेनुसार 32 शकुन चिन्हांनी सजवले होते. सभासदाच्या बखरीमध्ये 32 मण सोन्याचे म्हणजे 14 लाख रुपये मूल्य असलेले भव्य सिंहासन सोन्याच्या पत्र्याने बनवले होते. ..आणि आमचा राजा छत्रपती झाला दालनात उपस्थित जनतेने शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार सुरू केला आणि संपूर्ण दालन शिवमय होऊन गेले. यावेळी विविध तालवाद्य-सूरवाद्य वाजवण्यात आले. प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित असलेले गागा भट्टांनी पुढे येत राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ घोषित केले आणि आमचा राजा छत्रपती झाला. जमलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, प्रत्येकाचे मन भरून आले होते. कोवळ्या वयात असताना पासून शत्रूंशी न घाबरता स्वराज्य स्थापन करणारा शिवबा आज छत्रपती झाला होता. हा सोहळा केवळ सोहळा नव्हता, ही भावना होती. डोळे भर-भरून हा सोहळा मनात साठवून ठेवत होतो. समोर माझा राजा सिंहासनावर बसलेला अंधुक दिसू नये म्हणून डोळ्यात पाणी आले की लगेच मी गडबडीने पुसत होतो. जयघोष करत असताना अनेकांना हुंदका आलेलाही मी ऐकला, मावळ्यांची भावना तर शब्दांत मांडता येणार नाही. इतर पुरोहित मंडळी पुढे झाली आणि त्यांनी शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला. शिवाजी महाराजांनी यावेळी एकूण सोळा प्रकारचे महादान केले. त्यानंतर मंत्रिगणांनी सिंहासनापुढे जाऊन महाराजांना अभिवादन केले. महाराजांनी यावेळी त्यांना पदे, नियुक्तीपत्रे, धन, घोडे, हत्ती, रत्ने, शस्त्रे दान केली. हा सर्व सोहळा सकाळी 8 वाजेपर्यंत संपला. राज्याभिषेक सोहळा पार पडल्यावर शिवाजी महाराजांनी घोड्यावर सवार होऊन जगदीश्वराच्या मंदिराकडे गेले. तिथून हत्तीवर सवार होऊन मिरवणूक काढण्यात आली. यावेळी इतर दोन घोड्यांवर जरीपटका आणि भगवा झेंडा घेऊन सैन्याचे प्रतिनिधी होते. सोबत अष्टप्रधान आणि इतर सैन्य होते. रायगडाच्या दिशेने मिरवणूक जात असताना जनतेने फुलांचा वर्षाव केला, दिवे ओवाळले. सर्वत्र आनंदी आनंद होता.
कृष्णाजी अनंत सभासद यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, “या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह. मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट कांही सामान्य झाला नाहीं.”

  

Share