बाबासाहेबांच्या पुतळ्याला वकिलांचा विरोध:ग्वाल्हेर हायकोर्टातील संतापजनक घटना; प्रकाश आंबेडकर यांचा ‘मनुवादी’ म्हणत संताप
ग्वाल्हेर उच्च न्यायालयाच्या प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यास काही वकिलांनी कडाडून विरोध केला आहे. या प्रकरणी त्यांनी आंदोलनही केले होते. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष तथा बाबासाहेबांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही घटना केवळ लज्जास्पदच नव्हे, तर घोर जातीवादी आहे. बाबासाहेब व आंबेडकरी विचाराधारेविरोधातील हा द्वेष संबंधितांच्या मनुवादी डीएनएमध्येच आहे, असे ते म्हणालेत. प्रकाश आंबेडकर यासंबंधीच्या घटनाक्रमावर प्रकाश टाकताना म्हणाले की, ग्वाल्हेर हायकोर्टात काही आंबेडकरवादी वकील बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण काही वकील त्याला कडाडून विरोध करत आहेत. यासंबंधी ते करत असलेल्या आंदोलनावर माझी अनेक दिवसांपासून नजर आहे. मी माझ्या यापूर्वीच्या निवेदनातही म्हणालो होतो व आजही म्हणत आहे – ही केवळ लज्जास्पदच नव्हे तर घोर जातीयवादी घटना आहे. मी मनुवादी व ब्राह्मणांद्वारे दाखवण्यात येणाऱ्या द्वेषाने थक्क झालो आहे. बाबासाहेब व आंबेडकरी विचारधारेविरोधातील हा द्वेष त्यांच्या मनुवादी डीएनएमध्येच आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, ज्यांना माहित नाही, त्यांना मी सांगत आहे की, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या ग्वाल्हेर खंडपीठात बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याची विनंती आंबेडकरवादी वकिलांनी केली होती. 19 मार्च 2025 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या माननीय मुख्य न्यायाधीशांनी त्याला परवानगी दिली आणि ही परवानगी रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. पण तेव्हापासून काही मनुवादी वकील बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना रोखण्यासाठी शक्य ते सर्व मार्ग वापरत आहेत – प्रथम त्यांनी बाबासाहेबांना शिवीगाळ केली, नंतर त्यांनी निधीचा गैरवापर, प्रक्रियांचे पालन न करणे, बारला माहिती न देणे, बांधकाम समितीची परवानगी न घेणे इत्यादी आरोप केले. या वकिलांनी म्हटले आहे की, पुतळा बसवला जाणार नाही व बसवला तर तो वाचणारही नाही. जग बाबासाहेबांना मानते, पण भारतात… ते पुढे म्हणाले, 26 मार्च 2025 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या माननीय मुख्य न्यायाधीशांनी एक आदेश पारित केला की, काही वकील विरोध करत असतील तर आपण त्याकडे दुर्लक्ष करावे आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयात स्थापित केलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्यानुसार काम पूर्ण करावे. संपूर्ण जग बाबासाहेबांच्या प्रतिभेला मान देते व त्यांच्या अतुलनीय कार्यांचा आदर करते, पण भारतात ब्राह्मणवादी आणि मनुवादी त्यांचा द्वेष करतात! मी बाबासाहेबांचा पुतळा बसवण्याची मागणी करणाऱ्या आंबेडकरी वकिलांना मनापासून पाठिंबा देतो. तसेच आंबेडकरी समाजाने या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध करणाऱ्या जातीय विचारसरणीविरोधात आवाज उठवावा अशी मी विनंती करतो, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. हे ही वाचा… निवडणूक आयोग मोदी – शहाच्या पिंजऱ्यातील पोपट:निवडणूक आयोगाला विचारलेल्या प्रश्नाला भाजप का उत्तर देत आहे? – राऊत मुंबई – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी निवडणूक आयोग, भाजप व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पिंजऱ्यातील पोपट झाला आहे. खरा पोपट विठू विठू तरी बोलतो. पण हा पोपट तेवढाही बोलत नाही. सद्यस्थितीत हा पोपट जिवंत आहे की मेला? हे ही सांगण्याची कुणाची हिंमत होत नाही, असे ते म्हणाले. वाचा सविस्तर