बीडमधील गुन्हेगारीचे प्रकरण थांबायचे काही नावच घेत नसल्याचे दिसत आहे. एक अत्यंत धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. एका 16 वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीचे अपहरण करत तिचा विनयभंग करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत, तर या शाळकरी मुलीला प्लास्टिकच्या पाइपने बेदम मारहाण देखील केल्याचे समोर आले आहे. या घटनेने बीडमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. प्लास्टिकच्या पाइपने बेदम मारहाण घटनेची अधिकची माहिती अशी की, पीडित मुलगी ही आपल्या घरी होती. यावेळी आरोपी तिथे आले, त्यांनी तिला घरातून ओढत जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि कारमध्ये आरोपींनी विनयभंग केला. त्यानंतर आरोपींनी पीडित मुलीला एका ठिकाणी नेले व प्लास्टिकच्या पाइपने बेदम मारहाण केली. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर जीवे मारून टाकेल, अशी धमकी देखील आरोपींनी दिली. त्यानंतर पीडित मुलीला सोडून देण्यात आले. सध्या आरोपी फरार घडलेल्या या भयंकर प्रसंगानंतर पीडित मुलगी अत्यंत घाबरून गेली व आपल्या आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. पीडित मुलीसोबत घडलेला प्रकार ऐकून पीडितेचा वडिलांनी तिला घेत थेट नेकनूर पोलिस स्टेशन गाठले व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य लक्षात घेत या तिन्ही आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. या आरोपींच्या विरोधात विनयभंग, अपहरण व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलिस यांचा शोध घेत आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. पोलिसांचा धाक कमी होत चालल्याचे संकेत अनेक घटनांमधून स्पष्टपणे दिसून येत आहेत. कधी मारहाण, कधी अपहरण, तर कधी हत्या, महिलांवरील विनयभंग व बलात्काराच्या घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर बीडमध्ये गुन्हेगारीच्या विविध घटना सातत्याने घडत आहेत. नुकतीच एका पोलिसाकडून महिलेवर अमानुष मारहाणीची घटना उघडकीस आली आहे. याशिवाय, काही तरुणांनी केवळ दहशत पसरवण्यासाठी एका तरुणाची बोटं छाटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या सर्व घटनांमुळे बीड जिल्ह्यात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्ये संतापाचे आणि चिंतेचे वातावरण असून, पोलिस प्रशासनावर कायदा-सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे.