पुण्यात बोलताना काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या लॉबीमध्ये झालेल्या राड्यावरून त्यांनी सरकारला लक्ष्य केले. तसेच आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षावर प्रतिक्रिया देताना चव्हाण यांनी या घटनेसाठी सरकारला जबाबदार धरले आहे. त्यांनी म्हटले की, अशा घटनांमुळे लोकशाही मूल्यांचे आणि विधिमंडळाच्या प्रतिष्ठेचे अवमूल्यन होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विधिमंडळाला एक दर्जा आहे, लोकशाहीच्या मंदिरात जे चालू आहे ते लज्जास्पद आहे. सत्ताधारी पक्षांकडून बेशिस्त वर्तन होत आहे हे दुर्दैवी आहे, सभागृहात वापरली जाणारी भाषा मुलांच्या कानावर पडली तर काय परिणाम होतील? सभागृहाच्या बाहेर गुंड आणून मारामाऱ्या होत आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. रमी खेळणाऱ्या मंत्र्यांना दोष द्यायचा की ऑनलाईन रमी सुरु करणाऱ्या मोदी सरकारला दोष द्यायचा ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ऑनलाइन रमीमधून कर गोळा करण्याची व्यवस्था सरकारने केली आहे, मंत्री पदावरची माणसेही ऑनलाइन जुगाराचा मोह टाळू शकत नाहीत, ऑनलाइन जुगारामुळे पिढ्यान् पिढ्या उद्ध्वस्त होत आहेत. कोकाटेंचा राजीनामा घ्यायचा की नाही? हे त्यांना ज्यांनी मंत्री केले त्यांनी ठरवावे. फॅसिस्ट प्रवृत्तीमुळे लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. सत्ताधारी पक्षाने काही केले तर विरोधकांनी प्रत्युत्तर देणे साहाजिकच आहे. मात्र दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी अशा पद्धतीचे वर्तन करू नये, काँग्रेसची आत्ताच्या सत्ताधाऱ्यांशी तुलनाच होऊ शकत नाही, हे अगदी निर्ढावलेली लोक आहेत, यांना कशानेच काही फरक पडत नाही, असा जोरदार हल्लाबोल यावेळी चव्हाण यांनी केला आहे.