धर्म विचारून गोळ्या घालणारे मुसलमान होऊ शकत नाहीत:असे कृत्य करणाऱ्यांना इस्लाममधून काढले जाईल, अबू आझमींची मोठी प्रतिक्रिया
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी मंगळवारी हल्ला केला. या हल्ल्यात आत्तापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला समजला जात आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटन गंभीर जखमी झाले आहेत. या भीषण हल्ल्यामुळे जम्मू काश्मीरसह संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. या हल्ल्यात महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, दहशतवादी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. यावर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. धर्म विचारून जर गोळ्या घातल्या असतील तर ते खरे मुसलमान होऊ शकत नाहीत, असे अबू आझमी म्हणाले आहेत. धर्माच्या नावावर अशा प्रकारचे कृत्य करणारे लोक इस्लामला मानणारे असू शकत नाहीत. अशाच प्रकारची कृत्य करत राहिले तर त्यांना इस्लाममधून काढले जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. पुढे बोलताना अबू आझमी म्हणाले, सरकारने जर जम्मू काश्मीरमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था तैनात केली असेल तर मग हल्ला कसा झाला? याची जबाबदारीही सरकारने घ्यायला हवी. आता अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे, त्याचवेळी हा हल्ला झाला. तिथे जाणाऱ्या लोकांची जबाबदारी ही सरकारची आहे, असेही ते म्हणाले आहेत. दरम्यान, राजधानी दिल्लीत आता हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या हल्ल्याचे भारत दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणार असे निश्चितच झाले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील हा हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे म्हटले आहे. देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस आणि तिन्ही सैन्यदल प्रमुखांची बैठक घेतली आहे. यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल देखील उपस्थित होते. ही बैठक जवळपास साडे तीन तास सुरू होती. बैठकीत सैन्यदलांच्या तिन्ही प्रमुखांनी पाकविरोधी कारवायांचे पर्याय राजनाथ सिंहांसमोर ठेवले. आता हे तीनही पर्याय संध्याकाळी होणाऱ्या सीसीएसच्या बैठकीत पंतप्रधान मोदींसमोर मांडण्यात येणार आहेत. हल्ला करून दहशतवादी पाकिस्तानमध्ये पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून हे दहशतवादी पाकिस्तानमध्ये गेले असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमधून पहलगाममध्ये येण्यासाठी या दहशतवाद्यांना सुमारे आठ तास लागले असावेत, अशी माहिती समोर येत आहे. परत जाण्यासाठी देखील जवळपास तेवढाच वेळ लागला असावा. त्या हिशेबानं रात्री दहा ते अकराच्या दरम्यान त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला असावा अशी शक्यता आहे.