दिवा-मुंब्रा स्थानक दरम्यान लोकल म्हणून प्रवासी पडले:विरोधकांचा सरकारवर निशाणा तर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीच्या सूचना

ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर आज सकाळी काही प्रवासी लोकल ट्रेनमधून खाली पडले. त्यापैकी काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हे प्रवासी ट्रेनच्या गेटवर बसले होते, जिथून ते खाली पडले. समोर आलेल्या माहितीनुसार ही घटना लोकल ट्रेनची आहे. सकाळच्या वेळेत प्रचंड गर्दीमुळे हा अपघात झाला. या घटनेनंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. तर राज्यातील सत्ताधारी नेत्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन योग्य उपाय योजना करणार असल्याचे सांगितले आहे. राज्यातील काही प्रमुख नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील पहा… घटना अतिशय दुर्दैवी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण 8 प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केली आहे. रेल्वे प्रशासन लवकर ठोस पावले उचलेल – उपमुख्यमंत्री अजित पवार मध्य रेल्वेमार्गावर कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या उपनगरी रेल्वेगाडीतून पडून प्रवाशांचा झालेला मृत्यू दूर्दैवी, क्लेशदायक आहे. रेल्वे प्रवाशांच्या मृत्यूनं उपनगरी रेल्वेवरील गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्याकडे अधिक गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज अधोरेखीत झाली आहे. उपनगरीय रेल्वेसेवा अधिक प्रभावी आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे प्रशासन लवकरात लवकर ठोस पावलं उचलेल, असा विश्वास आहे. अपघातात जखमी प्रवाशांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून दिवंगत प्रवाशांना दु:खद अंतकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो,” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरेल्वेवर कोपर ते दिवा स्थानकादरम्यान झालेल्या रेल्वे अपघाताबद्दल दु:ख व्यक्त करुन दिवंगत प्रवाशांना श्रद्धांजली वाहिली आहे. रुळावरून घसरलेल्या ट्रीपल इंजिन सरकारमुळे मुंबईकरांचे रोज हाल – विजय वडेट्टीवार ​​​​​​​ मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये आज झालेला भीषण अपघात अत्यंत दुःखद आणि मन हेलावून टाकणारे आहे. मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लाखो प्रवाश्यांना रोज जीव मुठीत घेऊन लटकून प्रवास करावा लागतो. अश्याच ६ प्रवाशांचा आज अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुंबईतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करता येत नाही, गर्दीच्या वेळी अधिकच्या ट्रेन सोडल्या जात नाही, तिथे अधिक लाईन टाकल्या जात नाही,ट्रेनला उशीर झाला की गर्दी अजून वाढत जाते अशा मुंबई लोकलच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी रेल्वेमंत्री फक्त रिल्स बनवण्यात व्यस्त असतात. सामान्य मुंबईकर जीव मुठीत घेऊन लटकत ट्रेनमधून पोटापाण्यासाठी प्रवास करतात.हा लोकल ट्रेनचा प्रवास आता मुंबईकरांच्या जीवावर उठला आहे रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा ही आमची मागणी आहे. महायुती सरकारने आता तरी मुंबई लोकल ट्रेनच्या प्रश्नांबाबत केंद्राकडे पाठपुरावा करावा. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी – सुप्रिया सुळे पुष्पक एक्स्प्रेसमधून खाली पडल्यामुळे पाच प्रवाशांना प्राण गमावावे लागले. कसारा स्टेशनजवळ ही दुर्दैवी घटना घडली. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांना भावपूर्ण श्रद्धांजली. या गाडीत प्रचंड गर्दी असल्याने हे प्रवासी दरवाजात लटकून प्रवास करीत होते. अशा पद्धतीने प्रवास करणे धोकादायक आहे. नागरीकांना नम्र विनंती आहे की कृपया आपण धोकादायक पद्धतीने प्रवास करु नये. यासोबतच रेल्वे प्रशासनाने देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना करावी. ‘रील्स’ नव्हे, तर रिअल कामाची गरज – काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड ही अतिशय धक्कादायक आणि दु:खद घटना आहे. गर्दीमुळे रेल्वेतून पाच प्रवासी खाली पडून मृत्यूमुखी पडले, हे पूर्णपणे टाळता येण्यासारखं होतं. मृतांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करते. ही दुर्घटना पुन्हा एकदा अधोरेखित करते की मुंबईतील रेल्वे नेटवर्क मग ते उपनगरी असो वा लांब पल्ल्याच्या गाड्या अजूनही सुरक्षित नाहीत. वाढती गर्दी, व्यवस्थापनातील निष्काळजीपणा आणि अपुऱ्या सोयीसुविधांमुळे दररोज हजारो प्रवाशांचे प्राण धोक्यात येतात. हे प्रश्न आम्ही अनेकदा संसदेतही उपस्थित केले आहेत. रेल्वेला आता सोशल मीडियावरच्या ‘रील्स’ नव्हे, तर रिअल कामाची गरज आहे. एक नाही, अनेक दुर्घटनांनंतरही जबाबदारी घेण्याची तयारी सरकारमध्ये नाही, ही अत्यंत गंभीर बाब आहे. या अपघाताच्या सखोल चौकशीसह मृतांच्या कुटुंबीयांना योग्य नुकसानभरपाई, जखमींना संपूर्ण उपचार आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात, ही माझी मागणी आहे. यासोबतच या अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, ही माझी ठाम मागणी आहे.

  

Share