मुंबईतील गँगस्टर्स आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांनी वर्दीतील आपला प्रदीर्घ प्रवास संपवला आहे. ते गुरुवारी सहाय्यक पोलिस आयुक्त पदावरून निवृत्त झाले. 1995 साली मुंबई पोलिस दलात भरती झालेल्या दया नायक यांनी आपल्या सुमारे 31 वर्षांच्या सेवाकाळात अनेक गुन्हेगारांना ठार केले, गुन्हेगारीला आळा घातला आणि स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या या धाडसी आणि समर्पित सेवेला आता पूर्णविराम मिळाला आहे. दया नायक यांच्या पोलिस सेवेचा प्रवास अनेक संघर्षमय आणि वादग्रस्त वळणांनी भरलेला होता. जशी त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली, तसेच अनेक वादही त्यांच्या वाट्याला आले. मात्र, या सगळ्या परिस्थितीतही मुंबई पोलीस दलात त्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते. त्यांच्या धाडसी कार्यशैलीमुळे गुन्हेगारांमध्ये आजही त्यांचा धाक कायम आहे. दया नायक यांच्या नावावर तब्बल 86 एन्काउंटरची नोंद नव्वदच्या दशकात मुंबईतील गँगस्टर टोळ्यांचा पाडाव करण्यात दया नायक यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या नावावर तब्बल 86 एन्काउंटरची नोंद आहे. यामध्ये दाऊद टोळीतील 22 आणि राजन टोळीतील 20 गुंडांचा समावेश आहे. याशिवाय एलटीटीई (लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम), लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांशी संबंधित व्यक्तींनाही त्यांनी चकमकीत ठार मारले. दया नायक यांनी अनेक महत्वाच्या गुन्ह्यांचा तपास केला असून कंदहार विमान अपहरण प्रकरणाशी संबंधित तीन दहशतवाद्यांचा त्यांनी एन्काउंटर केला होता. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एक हजारांहून अधिक आरोपींना अटक केली असून 2006 मधील मुंबई रेल्वे स्फोटांच्या तपासातही ते सहभागी होते. विशेष म्हणजे, निवृत्तीच्या केवळ दोन दिवस आधी त्यांना सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर बढती देण्यात आली. दहा महिन्यांपूर्वीच ते या पदासाठी पात्र ठरले होते. दया नायक यांची कारकीर्द 1990 च्या दशकात मुंबई पोलिस दलात ‘एन्काउंटर स्पेशालिस्ट’ म्हणून ओळख निर्माण करणारे दया नायक आजही अंडरवर्ल्डविरोधी कठोर कारवाईचे प्रतीक मानले जातात. त्यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 86 कुख्यात गुंडांचा एन्काउंटर केला असून, त्यामध्ये अनेक दाऊद आणि छोटा राजन टोळीतील गुंडांचा समावेश आहे. कर्नाटकातील उडुपी येथे कोकणी भाषिक कुटुंबात जन्मलेल्या दया नायक यांनी कन्नड माध्यमातून सातवीपर्यंत शिक्षण घेतले. 1979 मध्ये नोकरीच्या शोधात ते मुंबईत आले आणि एका हॉटेलमध्ये काम करताना गोरेगावमधील महापालिकेच्या शाळेतून दहावी पूर्ण केली. पुढे अंधेरीतील सीईएस कॉलेजमधून पदवी मिळवली. प्लंबर अप्रेंटिस म्हणून काम करत असतानाच त्यांचा संपर्क अंमली पदार्थविरोधी विभागातील पोलिस अधिकाऱ्यांशी आला आणि पोलिस सेवेची प्रेरणा मिळाली. 1995 मध्ये पोलिस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण करून त्यांची जुहू पोलिस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली. मुंबईत अंडरवर्ल्डचा प्रभाव वाढलेला असतानाच डिसेंबर 1996 मध्ये त्यांनी छोटा राजनच्या दोन गुंडांचा एन्काउंटर केला आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ओळख तयार झाली. प्रसिद्धीसोबतच त्यांच्यावर वादांचेही सावट राहिले. 2004 मध्ये उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेच्या आरोपांमुळे त्यांच्या विरोधात एसीबी चौकशी सुरू झाली. मोक्का न्यायालयाच्या आदेशानंतर अंधेरी आणि कर्नाटकातील करकला येथे छापे टाकण्यात आले. त्यात दोन लक्झरी बसेससह अन्य संपत्तीची माहिती समोर आली आणि त्यांना अटक झाली. या वादळातून सावरत त्यांनी 2012 मध्ये अतिरिक्त पोलिस आयुक्त (पश्चिम) नियंत्रण कक्षात जबाबदारी स्वीकारली. मात्र 2014 मध्ये त्यांना पुन्हा निलंबित करण्यात आले आणि 2016 मध्ये त्यांची सेवेत पुनर्रचना झाली. दया नायक यांना निवृत्तीपूर्व दोन दिवस आधी सहाय्यक पोलिस आयुक्तपदी बढती देण्यात आली. त्यांच्या 31 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा समारोप या पदावरून निवृत्तीने झाला. अंडरवर्ल्डविरोधी लढ्यात त्यांचे योगदान आजही मुंबई पोलिस दलात आदराने स्मरले जाते.