हगवणे प्रकरणात आरोपींना राजकीय पाठबळ:सासरा, दीराच्या अटकेनंतर सुषमा अंधारेंचा संताप; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये सासरा राजेंद्र आणि दीर सुशील यांना अटक झाली आहे. यावर उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला आहे. हे आरोपी जर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे, ही गोष्ट अधिकच अधोरेखित होत असल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. या संदर्भात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना अटक झाल्यानंतर सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात सुषमा अंधारे म्हणाल्या की, वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणामध्ये पहाटे साडेचार वाजता दीर आणि सासरा यांना अटक झाली आहे. मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले की ते स्वतःहून हजर झाले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपी स्वतःहून हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे ही गोष्ट अधिकच अधोरेखित होते. ज्यावेळी वैष्णवी हगवणे यांच्या सासर्‍याला आणि दीराला अटक झाली, त्यावेळी ते हॉटेलमध्ये जेवण करत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात अधिकच धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात महिला आयोगावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असे जर सहा दिवसापासून रुसून बसलेला महिला आयोग सांगत असेल तर वैष्णवीचा जीव गेल्यापासून पाच दिवस होऊन गेल्यानंतरही सरकार ॲक्शन मोडमध्ये का आले नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वैष्णवी प्रकरणात आरोपींना अटक होत असतानाच नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. आता या प्रकरणात सुस्तावलेला आयोग ॲक्शन मध्ये कधी येणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणांमध्ये पहाटे साडेचार वाजता दिर आणि सासरा यांना अटक झाली. मात्र पोलिसांनी ताब्यात घेतले की आरोपी स्वतः हून हजर झाले अजून स्पष्ट झाले नाही. जर आरोपी स्वतःहून हजर झाले असतील तर आरोपींना राजकीय पाठबळ आहे हे गोष्ट अधिकच जात अधोरेखीत होते. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आले असं जेव्हा आत्ता सहा दिवसापासून रुसून बसलेला महिला आयोग सांगत असेल तर वैष्णवीचा जीव गेल्यापासून पाच दिवस होऊन गेल्यानंतरही सरकार ॲक्शन मोडमध्ये का आले नाही? वैष्णवी प्रकरणात आरोपींना अटक होत असतानाच नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यामध्ये भक्ती अथर्व गुजराती या तरुणीने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणात सरकार आणि सुस्तावलेला आयोग ॲक्शन मोडमध्ये कधी येणार आहे?

  

Share