मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यानंतर 65 किलो आरडीएक्स आले कुठून हा प्रश्न अनुत्तरित आहे. आतंकवादाला जात, धर्म, रंग, पंथ नसतो. तसेच आतंकवादाला धर्माचे नाव चिकटवणे योग्य नाही हे आधीपासून आम्ही सांगत आहोत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, बिल्कीस बानो प्रकरणातील आरोपींना जेलमधून बाहेर काढण्यात आले, त्यांचा सत्कार करण्यात आला, पेढे वाटण्यात आले ही कायद्याची पायमल्ली होती. कोर्टाने निकाल दिलेला आहे यावर अधिक काही बोलणे योग्य राहणार नाही. परंतू, यात काँग्रेसचा काही संबंध नाही. मुंबईच्या लोकल बॉम्ब ब्लास्टमधले देखील आरोपी निर्दोष सुटले मग हे काय कुठल्या राजकीय पक्षांनी केले काय? असे आव्हाड म्हणाले. हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी निकाल लागला पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, ज्या दिवशी हेमंत करकरे यांची हत्या झाली त्याच दिवशी या मालेगाव खटल्याचा निकाल लागला होता असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. बॉम्बब्लास्ट झाल्यापासून माझा प्रश्न आहे आरडीएक्स हे तीन-चार आतंकवादी संघटनांकडेच आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांकडे मुबलक आरडीएक्स असते, असेही आव्हाड म्हणाले. महादेव मुंडेंना मीच मारले असे म्हणायला एक महिला उभी केली जाईल महादेव मुंडे प्रकरणाचा तपास नीट झालेला नाही हे पुराव्यानिशी सिद्ध होते. या खुना मागचा आका कोण होता आणि कुठल्या आकाने खून केला हे बीडकरांपासून काही लपून राहिलेले नाही. मला जी माहिती बीडमधून मिळते आहे, त्यानुसार एक महिला तयार होईल आणि ती सांगेल की महादेव मुंडेला तिनेच मारले याची संपूर्ण तयारी झालेली आहे. बघू आता ती महिला किती हिंमत दाखवते. त्या महिलेला पुढे केले जाईल आणि आकाला वाचवण्यासाठी हे केले जाईल, असाही दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. पुणे कथित रेव्ह पार्टी प्रकरणी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, रेव्ह पार्टी कशाला म्हणतात हे ग्रामीण भागात किंवा त्याच्याशी संबंधित नसलेल्यांना माहिती नसेल. रेव्ह पार्टी म्हणजे 100 ते 200 समुदाय एकत्र येणार तिथे मुबलक प्रमाणात दारू असणे, मोठमोठ्याने म्युझिक लावणे, मोठ्या प्रमाणात नाच असे रेव्ह पाटीचे स्वरुप असते. घरात चार-पाच जण काही करत असतील त्याला रेव्ह पार्टी म्हणतात असे माझ्या तरी ऐकण्यात आलेले नाही. प्रकाश आंबेडकरांचे अभिनंदन केले पाहिजे जेव्हा हे प्रकरण झाले तेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरच्यांशी बोलून विधानभवनात हे प्रकरण मांडण्याचा जोरदार प्रयत्न आपण केला होता. त्याला सरकारकडून देण्यात आलेल्या उत्तरांनाही आपण प्रत्युत्तर दिले होते. लागोपाठ तीनही अधिवेशनामध्ये अर्धा- अर्धा तास भाषण करून ज्या आईने आपला मुलगा गमावला त्या आईच्या वेदना मी विधानभवनात एक विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मांडण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत होतो प्रकाश आंबेडकर हे कोर्टामध्ये लढाई लढत होते, त्यांची लढाई वेगळी आमची लढाई वेगळी होती. त्यांच्या लढाईला यश आले त्यांचे अभिनंदनच केले पाहिजे.