कोकणात मनसेला बसणार धक्का!:राज ठाकरेंचा कट्टर समर्थक शिंदे गटाच्या मार्गावर, वैभव खेडेकरांना खुली ऑफर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कोकणात मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये निराशाजनक कामगिरी असूनही सतत चर्चेत राहणाऱ्या राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसेमधील अंतर्गत नाराजी आता उफाळून येताना दिसतेय. पक्षाचे सरचिटणीस वैभव खेडेकर हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खेडेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून सूचक संदेशही दिला आहे. त्यांच्या या नाराजीमुळे ते लवकरच वेगळा निर्णय घेऊ शकतात, असे बोलले जात आहे. अलीकडेच रत्नागिरीतील एका कार्यक्रमात शिंदे गटाचे नेते रामदास कदम आणि उदय सामंत यांनी वैभव खेडेकर यांना थेट आपल्या पक्षात येण्याचे खुले आमंत्रण दिले होते. या कार्यक्रमात खेडेकर यांची उपस्थितीही विशेष लक्षवेधी ठरली होती. त्यानंतर लगेचच त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. हे प्रकरण केवळ वैभव खेडेकरपुरतेच मर्यादित नाही. यापूर्वी पुण्याचे ठसकेबाज नेते वसंत मोरे यांनीही मनसे सोडत पक्षाच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त केली होती. आता खेडेकर यांनीही तशाच प्रकारचा सूर आळवला आहे. विशेषतः पक्षातील जुन्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना योग्य वेळ किंवा महत्त्व दिले जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ‘जय महाराष्ट्र’ वैभव खेडेकर यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर ‘जय महाराष्ट्र’ लिहून सूचक संदेशही दिला आहे, ज्यामुळे दापोली-खेड परिसरातील राजकीय चर्चांना चांगलाच उधाण आले आहे. त्यांच्या या नाराजीमुळे मनसेसमोर कोकणात अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे राहिले असून, पुढील काही दिवसांत त्यांचा निर्णय पक्षाच्या भवितव्यावर मोठा परिणाम करू शकतो. वैभव खेडेकर यांना राज ठाकरेंकडे मीच घेऊन गेलो होतो- रामदास कदम दरम्यान, रत्नागिरी येथील चिंचघर येथील कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते रामदास कदम, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री उदय सामंत, मंत्री योगेश कदम, माजी आमदार संजय कदम आणि मनसेचे नेते वैभव खेडेकर एकाच व्यासपीठावर होते. यावेळी रामदास कदम म्हणाले, वैभव खेडेकर यांना राज ठाकरेंकडे मीच घेऊन गेलो होतो. वैभव खेडेकर यांचा राजकीय गुरू मीच आहे. आपण एका कुटुंबातली माणसं आहोत, पुढे काय करायचं हे वैभव खेडेकर यांना माहिती आहे. ‘समजने वाले को इशारा काफी है’, असे म्हटले आहे. तसेच उदय सामंत यांनी देखील आज जे व्यासपीठ तयार झाले आहे ते असेच राहावे, असे म्हणत वैभव खेडेकर यांना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे.

  

Share