कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील ‘माधुरी’ हत्तीणीला गुजरातमधील ‘वनतारा’ वन्यजीव केंद्रात हलवल्यानंतर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रातून सामाजिक माध्यमांवर तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अनेकांनी हत्तीणीला तिच्या मूळ स्थळी परत आणण्याची मागणीही केली होती. या पार्श्वभूमीवर आता वनतारा प्रशासनाकडून प्रसिद्धी पत्रक आणि ‘माधुरी’ची काही छायाचित्रे शेअर करून तिच्या स्थितीबाबत आणि आपण महादेवी अर्थात माधुरीला वनतारामध्ये का नेले याचे स्पष्टीकरण दिले आहे. वनताराने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर माधुरीचे काही फोटो शेअर केले असून, त्या फोटोसह हत्तीणीच्या दैनंदिन निगा, वैद्यकीय तपासण्या आणि सवयी लक्षात घेऊन केलेल्या व्यवस्थांची माहिती दिली आहे. वनताराकडून शेअर करण्यात आली पोस्ट जशीच्या तशी कोल्हापूर येथील स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी संस्थान मठ मधून अलिकडेच स्थलांतरित झालेल्या महादेवी (माधुरी) हत्तीणी सोबत असलेल्या प्रेम आणि आध्यात्मिक भावनांविषयी वनतारा खूप आदर बाळगते. आम्ही ओळखतो की तिची तिथे उपस्थिती केवळ प्रतीकात्मक नव्हती, तर अनेकांसाठी पवित्र होती. आम्ही हे स्पष्ट आणि आदरपूर्वक सांगू इच्छितो की वनताराने ही कार्यवाही स्वतःहून केली नाही. ही कार्यवाही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत करण्यात आली, ज्याला नंतर भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयानेही मान्यता दिली. आम्ही या स्थलांतराचे आरंभकर्ता नव्हतो, तर न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणारी संस्था होतो, जी हिच्या देखरेखीची जबाबदारी पार पाडत आहे. माधुरी हिच्या आरोग्याचे आणि दीर्घकालीन कल्याणाचे रक्षण करणे हाच आमचा एकमेव हेतू राहिला आहे. हिला आमच्या देखरेखीखाली आणण्याची संपूर्ण प्रक्रिया प्रेमपूर्वक, जबाबदारीने आणि कायदेशीर तसेच नैतिक निकषांचे काटेकोर पालन करत पार पाडली गेली. जनतेच्या तीव्र भावनिक प्रतिसादाची आम्हाला पूर्ण जाणीव आहे आणि आम्ही त्याबाबद मनापासून सहानुभूती बाळगतो. म्हणूनच, करुणा आणि ऐक्याच्या भावनेतून, आम्ही कोल्हापूर येथील जैन मठ व पूज्य स्वामीजी यांच्यासोबत थेट संवाद सुरू केला आहे. कायदेशीर आणि पशुवैद्यकीय सल्ल्याच्या आधारे, आम्ही माधुरी हिच्या भविष्यासाठी सर्व शक्यता तपासत आहोत. ज्या द्वारे शांततामय मार्गे माधुरी च्या कल्याणासोबतच समाजाच्या भावनांचा देखील सन्मान राखला जाईल. वनतारा कोणत्याही धर्म, प्रदेश किंवा परंपरेच्या विरोधात नाही. आम्ही अशा मुक्या जीवांच्या सेवेसाठी आहोत, जे मानवी करुणेवर अवलंबून आहेत. आम्ही पारदर्शकतेस, कायद्याच्या पालनास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे करुणेला पूर्णपणे वचनबद्ध आहोत. आम्ही जनतेला संघर्षासाठी नाही, तर माधुरी व अशा प्रत्येक प्राण्याच्या सन्मानपूर्वक व शांत आयुष्याच्या अधिकारासाठी आमच्या सोबत उभे राहण्याचे विनम्र आवाहन करतो.