महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी:अॅम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू, मुंबईतील घटनेने खळबळ महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी:अॅम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू, मुंबईतील घटनेने खळबळ

महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी:अॅम्ब्युलन्स अडकल्याने महिलेचा मृत्यू, मुंबईतील घटनेने खळबळ

ठाणे-घोडबंदर महामार्गावर सुरू असलेल्या खड्डे दुरुस्तीमुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीने आणखी एका महिलेचा बळी घेतला. पालघर जिल्ह्यातील सफाळे (मधुकर नगर) येथील छाया कौशिक पुरव यांना घेऊन जाणारी ॲम्ब्युलन्स मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर विरार-वसई ते घोडबंदरपर्यंतच्या प्रचंड वाहतूक कोंडीत अडकली. यामुळे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. छाया पुरव या मूळच्या पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील होत्या, पण मुंबईतील माहीम कोळीवाडा येथे राहत होत्या. ३० जुलै रोजी सुट्टीसाठी त्या आपल्या गावी आल्या होत्या. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ झाडांच्या फांद्या कापण्याचे काम सुरू असताना अचानक एक झाड कोसळले आणि त्या गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला त्यांना पालघरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती अधिक गंभीर झाल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुंबईतील एका खासगी रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतला. मुंबईकडे जात असताना घोडबंदर महामार्गावर दुरुस्ती कामांमुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती, त्यामुळे ॲम्ब्युलन्सला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना तात्काळ मिरा रोड येथील ऑर्बिट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. जर ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचली असती, तर छाया पुरव यांचे प्राण वाचले असते, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे स्थानिक लोकांमध्ये तीव्र संताप असून, महामार्गावरील दुरुस्तीच्या कामांचे नियोजन आणि वाहतूक व्यवस्थापनावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विक्रोळी येथील पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एका १७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. निखिल चोरगे असे या मुलाचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या कुटुंबाने मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. निखिलला ताप आल्याने रुग्णालयातून औषध दिल्यानंतर त्याला उलट्या झाल्या. त्याला पुन्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकारामुळे रुग्णालयाबाहेर मोठी गर्दी झाली असून, नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *