मलबार हिल परिसरात म्हाडा इमारतीचा भाग कोसळला:रहिवाशांना केले स्थलांतरीत, पुण्यातील दौंडमध्ये पावसाचा पहिला बळी

मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दुपारच्या सुमारास मलबार हिल येथील तीनबत्ती परिसरात एक इमारतीचा आणि संरक्षण भिंतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेनंतर इमारतीतील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे.या घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती अद्याप प्राप्त झाली नाही. दुसरीकडे, पुण्यात अंगावर भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. दौंड शहरात ही घटना घडली. मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस झोडपत आहे. आज मलबार हिल परिसरातील तीनबत्ती रोडवरील एका जुन्या म्हाडाच्या इमारतीमध्ये नूतनीकरणाचे काम सुरू होते. यादरम्यान फाउंडेशनचा आणि संरक्षण भिंतीचा काही भाग आज पावसामुळे कोसळला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. या घटनेनंतर इमारतीमधील रहिवाशांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. भिंतींचा भाग रस्त्यावर आल्यामुळे वाहतूक देखील संथ करण्यात आली आहे. तीनबत्तीच्या या रोडवरून मोठी वाहतूक होत असते. व्हीआयपी लोकांचा हा रहदारीचा मार्ग आहे. बाणगंगा कंपाऊंड भिंतीचा काही भाग कोसळला दरम्यान, दक्षिण मुंबईतील मलबार हिल येथील हेरिटेज बाणगंगा तलावाच्या कंपाऊंड भिंतीचा काही भाग रविवारी संध्याकाळी पावसात कोसळला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. महालक्ष्मी मंदिराजवळील ऐतिहासिक स्थळावर कंपाऊंड भिंतीचा 10-15 फूट भाग कोसळला होता. दौंडमध्ये पावसाचा पहिला बळी दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात पावसाने पहिला बळी घेतला आहे. पावसामुळे अंगावर घराची भिंत पडून एका 75 वर्षीय वृद्ध मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ताराबाई विश्वचंद आहिर असे मृत महिलेचे नाव आहे. ताराबाई एका दुकानात बसल्या होत्या. तेव्हा त्यांच्या अंगावर जुन्या बांधकामाची भिंत कोसळली. या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दौंडचे तहसीलदार अरुण शेलार यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. पावसामुळे महाराष्ट्रात अलर्ट दरम्यान, मान्सून मुंबईसह महाराष्ट्रात दाखल झाला असून हवामान खात्याने पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी उद्या रेड अलर्ट आहे. पालघरसाठी यलो अलर्ट आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हे ही वाचा… मुंबईसाठी हवामान खात्याचा रेड अलर्ट:मुख्यमंत्र्यांनी घेतला स्थितीचा आढावा, प्रशासन अलर्ट मोडवर; मंत्रालय परिसरात गुडघाभर पाणी मागील 24 तासांपासून मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत आज सकाळपासून पाऊस झोडपत आहे. यामुळे शहरात विविध ठिकाणी 7-8 किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः ताशी 70 ते 80 किमी वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शहरात काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. काळ्याकुट्ट ढगांमुळे मुंबईतील दृश्यमानता खूपच कमी झाली आहे. त्याचा फटका हवाई सेवेला बसला आहे. पूर्ण बातमी वाचा…

  

Share