महाराष्ट्राचे कृषिमंत्री व अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला गेल्याची माहिती समोर आली आहे. विधिमंडळाचे कामकाज सुरू असताना माणिकराव कोकाटे मोबाइलवर रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर विरोधकांनी व अनेक शेतकरी संघटनांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली. विरोधाचे तीव्र पडसाद उमटत असल्याचे पाहता माणिकराव कोकाटे हे आज अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे आता अजित पवार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. बैठक संपल्यावर अजित पवारांच्या दालनातून बाहेर आल्यावर पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु, माणिकराव कोकाटे यांनी बोलणे टाळल्याचे दिसून आले. माणिकराव कोकाटे कॅबिनेट बैठकीला देखील गेल्याचे दिसले. त्यामुळे तूर्त अभय मिळाले असल्याचा दावा केला जात आहे. अजित पवार – कोकाटेंत काय चर्चा झाली? अजित पवार व माणिकराव कोकाटे यांच्यात झालेल्या चर्चेचा सविस्तर तपशील समजू शकला नाही. पण त्यांनी कोकाटेंना अत्यंत कडक शब्दात समज दिली असावी, असे सांगितले जात आहे. वृत्तवाहिनींच्या वृत्तानुसार, कितीवेळा चुकणार? कितीवेळा माफ करायचे? आम्ही तुम्हाला खूप सांभाळून घेतले. पण आता विषय पुढे गेला आहे. तुमच्यामुळे सरकारची बदनामी होत आहे, अशा शब्दांत अजित पवारांनी कोकाटेंना समज दिली. विधिमंडळात रम्मीचा डाव राज्याचे पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात विरोधकांनी सरकारला अनेक मुद्यांवरून कोंडीत पकडल्याचे पाहायला मिळाले. त्यात भर पडली ती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळतानाच्या व्हिडिओची. त्यांचा मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्हायरल केला होता. त्यानंतर विरोधकांनी आक्रमक पद्धतीने माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून रमी खेळत बसणारा कृषिमंत्री नको, असे म्हणत विरोधकांनी कडाडून विरोध केला. याचे पडसाद बाहेरही पाहायला मिळाले. अनेक शेतकरी संघटनांनी देखील कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. माणिकराव कोकाटेंचे वादग्रस्त विधान भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही, आम्ही एक रुपयात पीकविमा देतो, असे वक्तव्य कोकाटे यांनी केले. हे वक्तव्य शेतकऱ्यांच्या विरोधात नाही तर सरकारला उद्देशून आहे, असे सांगताना पुन्हा चूक केली आणि शेतकरी भिकारी नाही, तर सरकार भिकारी आहे, वादग्रस्त विधान केले. कांदा काढल्यानंतर आता काय ढेकळांचा पंचनामा करायचा का? आणि पीक विम्याची रक्कम घेऊन तुम्ही मुला, मुलींची लग्ने, साखरपुडा करता. ती रक्कम शेतीत गुंतवत नाही, अशी वादग्रस्त विधाने माणिकराव कोकाटे यांनी केली आहेत.