‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळे पुस्तक होऊ शकते:संजय राऊतांच्या पुस्तकावर नितेश राणेंची टीका, म्हणाले- त्यांचा पुस्तकाचा भाग दोन होऊ शकतो
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे अलीकडेच प्रकाशन झाले. आर्थर रोड कारागृहातील वास्तव्यातील अनुभवांवर आधारित हे पुस्तक त्यांनी लिहिले आहे. मात्र, या पुस्तकावर भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार टीका करत संजय राऊत यांच्यावर सडकून निशाणा साधला आहे. मातोश्रीतला नरक ‘मातोश्रीतला नरक’ हे वेगळे पुस्तक होऊ शकते. संजय राजाराम राऊतच्या पुस्तकाचा भाग दोन मातोश्रीतला नरक असे होऊ शकते, अशी बोचरी टीका केली आहे. ठाकरे गटाच्या प्रचाराच्या शुभारंभावरही त्यांनी टीका केली. ठाकरे गटाची मोहीम ही शिवसेनेसाठी आहे की, आपल्या आदित्यला वाचवण्यासाठी आहे याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा बाजार उठलेला आहे. त्यामुळे जवळचे शिवसैनिक महायुतीत म्हणजेच भाजप आणि प्रामुख्याने शिवसेना शिंदे गटात जात आहेत. त्यामुळे ही मोहीम शिवसेनेसाठी नसून त्यांच्या आदू बाळासाठी आहे. याबाबत उद्धव ठाकरे स्पष्ट करावे आणि नौटंकी बंद करावी. बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार राज ठाकरे पुढे बोलताना नितेश राणे म्हणाले, शरद पवार किंवा त्यांचा पक्ष काय भूमिका घेतो, हे सांगण्याचा अधिकार मला नाही. शरद पवारांचे काही उरले-सूरले कार्यकर्ते सोलापुरात असतील तर त्यांना शोधा आणि विचारा. मनसे आणि ठाकरे गटाच्या संभाव्य युतीवर बोलताना नितेश राणे म्हणाले, आदरणीय राज साहेबांचा अपमान उद्धवजींनी किती वेळा आणि कसा केला याचे एक स्वतंत्र पुस्तक होऊ शकते. निष्ठावान मनसैनिक का अस्वस्थ आहे असे तुम्हाला वाटते? अमेय खोपकर, संदीप देशपांडे का अस्वस्थ आहेत? खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे यांचा वारसदार राज ठाकरे असताना देखील त्यांना सगळ्या पद्धतीने त्रास देऊन, अपमानित करून शिवसेना सोडायला लावली, असेही नितेश राणे यांनी म्हटले. रोजी रोटीसाठी राज ठाकरेंना गोंजारत आहेत नितेश राणे म्हणाले, बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे राज ठाकरे शिवसेना बांधत होते. त्यावेळचा शिवसैनिक बाळासाहेबांचा उत्तराधिकारी म्हणून राज ठाकरेंकडे बघत होता. राज ठाकरेंचा त्यांनी किती वेळा अपमान केला हे माझ्यासारख्या जुन्या शिवसैनिकाला विचारा. मातोश्रीतला नरक हे वेगळं पुस्तक होऊ शकते. त्यावेळी अपमान करायचा आणि रोजी रोटीसाठी राज ठाकरेंना गोंजारत बसायचे असे सुरू आहे. तसेच राजसाहेब सुज्ञ आहेत. भांडण मिटून दोन ठाकरे एकत्र येत असतील तर आम्हाला आनंद आहे. मात्र शेवटी राज ठाकरेंचा जो अपमान झाला, ते सर्वजण विसरले नसतील असे मला वाटते, असेही यावेळी नितेश राणे यांनी म्हटले आहे.