नाना पटोलेंचा संग्राम थोपटेंना सल्ला:म्हणाले- ज्या पक्षाने मोठे केले त्याच्यावर आरोप करायचे नसतात; जिकडे जाऊ पाहता तिकडे फार अंधार

काँग्रेस पक्षात मला सातत्याने डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षाच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी आज आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे अधिकृत जाहीर केले आहे. यावर आता कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देत संग्राम थोपटे यांना सल्ला दिला आहे. नाना पटोले संग्राम थोपटे यांना उद्देशून म्हणाले, ज्या पक्षाने तुम्हाला मोठ केले, नावारुपाला आणले त्याच्यावर आरोप करायचे नसतात. जिकडे तुम्ही जाऊ पाहता तिकडे फार अंधार आहे, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. दरम्यान, 22 एप्रिल रोजी आपण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संग्राम थोपटे यांनी जाहीर केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा 22 एप्रिल रोजी मुंबईत होणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. काँग्रेस पक्षात आपल्याला अनेकदा डावलण्यात आले असल्याचा आरोप संग्राम थोपटे यांनी केला आहे. काँग्रेस पक्षात अनेक वर्षांपासून मी आणि माझ्या वडिलांनी देखील काम केले आहे. त्यामुळे दुःख वाटत आहे. मात्र तालुक्याच्या विकासासाठी, तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी हा निर्णय आम्ही घेतला असल्याचे संग्राम थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मी कोणाच्याही दबावाला कधी बळी पडलो नाही. लोकसभा निवडणुकीत देखील तुम्ही पाहिले असेल की, भोर तालुक्यात लोकसभेच्या निवडणुकीत देखील महा विकास आघाडीचे काम आम्ही प्रामाणिकपणे केले होते. महा विकास आघाडीचा धर्म पाळत आम्ही महा विकास आघाडीचे काम केले. आम्ही काम केले म्हणजे कोणावर उपकार केले नाहीत. मात्र, जे केले ते सांगायला काही हरकत नसल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे. इतरही अनेक जबाबदारी मला पक्षाने दिली. त्या सर्व जबाबदाऱ्या आपण पार पाडल्या असल्याचे थोपटे यांनी म्हटले आहे. हेही वाचा

  

Share